कोलकाता : मणिपूरच्या पश्चिम इंफाळ जिल्ह्यात जमावाने तिघा जणांना घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका अडवून तिला आग लावल्याच्या घटनेत रुग्णवाहिकेतील आठ वर्षांचा जखमी मुलगा, त्याची आई व एक नातेवाईक असे तिघे जण मरण पावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठ वर्षांच्या एका मुलाला गोळीबारात डोक्यात गोळी लागल्यामुळे, त्याची आई व एक नातेवाईक त्याला रुग्णालयात नेत असताना इकोइसेंबा येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

तोनसिंग हांगसिंग (८), त्याची ४५ वर्षांची आई मीना हांगसिंग आणि नातेवाईक लिडिआ लुरेमबाम (३७) अशी मृतांची नावे आहेत.

आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला, तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शिबिरातील व आसपासच्या भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे सांगितले.

एका आदिवासी इसमाचा मुलगा असलेला तोंगसिंग आणि त्याची मैतेई समुदायातील आई हे कांगचुप येथे आसाम रायफल्सच्या निवारा शिबिरात राहात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ४ जूनला या भागात गोळीबार सुरू झाला आणि शिबिरात असूनही या मुलाला गोळी लागली.

मणिपूरमधील हिंसाचाराबाबत काँग्रेसचा पंतप्रधानांना प्रश्न

पीटीआय, नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का आहेत आणि ते या राज्याला भेट देऊन सलोख्याचे आवाहन का करत नाहीत, असा प्रश्न काँग्रेसने बुधवारी विचारला.

सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाला मणिपूरला भेट देण्यासाठी पंतप्रधान प्रोत्साहन का देत नाहीत, असाही प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. ‘गेल्या सात आठवडय़ांपासून मणिपूरला गिळणारे अरिष्ट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गृहमर्त्यांनी या भागाला उशिरा, म्हणजे एक महिन्यानंतर भेट दिली आणि अशा लहान अनुकंपांसाठी देशाने त्यांचे आभारी असले पाहिजे’, अशी कोपरखळी रमेश यांनी ट्विटरवर मारली. मात्र, पंतप्रधान याबाबत गप्प का आहेत. ते या राज्याचा दौरा करून विविध समुदायांमध्ये समेटाचे आवाहन का करत नाहीत, असा प्रश्नही रमेश यांनी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people including a child die in violence in manipur zws
First published on: 08-06-2023 at 07:09 IST