![congress india bloc will raise manipur issue with full force in parliament says rahul gandhi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/rahul-gandhi-11-1.jpg?w=310&h=174&crop=1)
मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.
१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.
हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.