आज आपण जुन्या संसदेला निरोप देत आहोत. मात्र या वास्तूला खूप मोठा इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाला त्या घटनेचा साक्षीदार हा सेंट्रल हॉल आहे. या सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या तिरंगा, भारताचं राष्ट्रगीत यांचा स्वीकार झाला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंग या हॉलने आणि या इमारतीने पाहिले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेतल्या सेंट्रल हॉल सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. १८ सप्टेंबरपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट्रल हॉलमधून खासदारांना संबोधित केलं. त्याआधी जुन्या संसदेत फोटोसेशनही झालं. आजपासून नव्या संसदेत कामकाज सुरु होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्यात त्यांनी सेंट्रल हॉलचा इतिहास आत्तापर्यंत तयार करण्यात आलेले कायदे या सगळ्यांवर भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९५२ नंतर जगातल्या जवळपास ४१ राष्ट्राध्यक्षांनी या सेंट्रल हॉलमध्ये येऊन माननीय खासदारांना संबोधित केलं आहे. आपल्या राष्ट्रपतींनी या हॉलमध्ये आत्तापर्यंत ८६ वेळा संबोधन केलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेने आत्तापर्यंत चार हजारांहून जास्त कायदे मान्य केले आहेत. तीन अधिवेशनांशिवाय इतर अधिवेशनांमध्येही कायदे पास करण्यात आले. दहशतवादाशी लढण्याविषयीचा कायदा, हुंड्याविरोधातला कायदा, मुस्लिमांना जो न्याय हवा होता, शाहबानो केसचं जे प्रकरण होतं त्यात ज्या चुका झाल्या होत्या त्या आपण सुधारल्या. ट्रिपल तलाक विरोधी कायदा आपण पास केला.

आपल्या देशातल्या ट्रान्सजेंडर्ससाठीही आपण कायदा आणला. त्यांना सन्मान मिळावा, नोकरीत, शिक्षणात आरक्षण मिळावं म्हणून आपण पाऊल उचललं. दिव्यांगासाठी उज्वल भविष्याचे कायदे आपण तयार केले. अनुच्छेद ३७० पासून ते अनेक असे निर्णय आपण घेतले. या सभागृहात आक्रोश व्यक्त झाला, चिंता व्यक्त झाली हे पण स्वीकारलं पाहिजे. पण आपण फुटीरतावाद, दहशतवाद याविरोधात लढण्यासाठी अनुच्छेद ३७० रद्द करणं खूप आवश्यक होतं असंही मोदींनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये आज शांतता आणि विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत. पुढे जायचा एकही क्षण त्यांना सोडायचा नाही. संसदेच्या सदस्यांनी देशासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. लाल किल्ल्यावरुन मी सांगितलं होतं हीच ती योग्य वेळ आहे. एकामागून एक घटना बघा, प्रत्येक घटना या गोष्टीचा साक्षीदार आहे की भारत देश आज नव्या चेतनेसह पुनर्जागृत झाला आहे. नव्या उर्जेने भरलेला हा देश झाला आहे. हीच चेतना, हीच उर्जा देशाच्या कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करु शकते हे आपण पाहतो आहो असेही गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.

आज देश ज्या दिशेने वाटचाल करतोय त्या वाटचालीचं फळ देशाला नक्की मिळेल. आपण जितकी गती वाढवू तितके परिणाम लवकर मिळतील. आज आपण जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत पण आपल्याला पहिल्या तीन क्रमांकात जाऊन बसायचं आहे, आपण त्या दिशेने जात आहोत. मी अत्यंत विश्वासाने हे तुम्हाला सांगू शकतो आपल्यातले काही लोकच निराश होतील पण जगाला विश्वास आहे की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या तीन देशांच्या रांगेत असेल. भारताचं बँकिंग सेक्टर जगात सकारात्मक चर्चेचं केंद्र झाला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

छोट्या कॅनव्हासवर मोठं चित्र काढता येईल का? तर नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांचा कॅनव्हास वाढवला नाही तर भव्य भारताचं चित्र आपण कसं रेखाटणार? आपल्याकडे ७५ वर्षांचा अनुभव आहे. जे मार्ग आपल्याला आपल्या पूर्वजांनी दाखवले आहेत. त्यातून आपण खूप काही शिकलो आहोत. आपल्याला जे अनुभवांच्या शिदोरीतून मिळालं आहे ती आपली परंपरा आहे. या परंपरेशी जोडले जात आता आपल्याला आपल्या विचारांची कक्षा वाढवायची आहे. येणाऱ्या पिढीला आपण भव्य भारत भेट म्हणून देऊ शकतो. आता आपल्याला मोठ्या कॅनव्हासवर काम करायचं आहे. आत्मनिर्भर भारत या दिशेने आपलं प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे. त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी मागे ठेवल्या पाहिजे. मी जेव्हा आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना वाटलं की मी हे काय बोलतो आहे? हे खरंच शक्य आहे का? मात्र पाच वर्षांच्या आत जगात आत्मनिर्भर भारत ही संकल्पना चर्चिली गेली आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We have to make the right decisions at the right time for the future said pm modi in central hall speech scj