नवी दिल्ली, पीटीआय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर यमुना नदीचे पाणी जाणूनबुजून प्रदूषित करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना वक्तव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. तर भाजप व काँग्रेसने याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर टीका केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा उरला असताना यमुना नदीच्या पाण्यावरून आरोपांची राळ उडाली आहे.

हरिणातील भाजप सरकार यमुना नदीचे पाणी प्रदूषित करून ते दिल्लीत पाठवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी सोमवारी केला होता. दिल्लीतील नागरिकांनी जर असे पाणी वापरले तर काही जणांचा मृत्यू होईल. या पेक्षा गंभीर कृत्य काय असू शकते, असा सवाल केजरीवाल यांनी केला होता. त्यावर भाजप व काँग्रेसने टीका केली. मुख्यमंत्री आतिशी यांनीही केजरीवाल यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता.

भाजपचे प्रत्युत्तर

भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. केजरीवाल यांचे वक्तव्य धोकादायक असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीचे हे विधान बेजबादारपणाचे आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. दरम्यान काँग्रेसनेही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी मागणी केली. आरोप खोटा असला तर, केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

निवडणूक आयोगाकडून दखल

निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना वक्तव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगितले आहे. याबाबत आयोगाने पत्र पाठवले असून. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत उत्तर द्यावे अशी सूचना केजरीवाल यांना केली.

निवडणूक प्रचार सुरु असताना जनतेत भीती निर्माण होईल अशा वक्तव्यांना रोखले पाहिजे. या प्रकरणी केजरीवाल यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी. -संदीप दीक्षित, काँग्रेस नेते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamuna water dispute election commission takes note of arvind kejriwal allegations amy