सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपावर टीका होत असताना ही बैठक झाल्याने अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या आहेत.
हेही वाचा – भाजपाला अहंकारी म्हटल्यानंतर संघाच्या नेत्याचे घुमजाव; आता म्हणतात, “ज्यांनी रामाचा…”
‘द इंडियन एक्सप्रेस’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरसंघचालक मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शनिवारी दोन वेळा भेट झाली. सकाळी मोहन भागवत हे संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोरखपूर येथील कैपियरगंज येथे पोहोचले. त्या ठिकाणी मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची पहिली भेट झाली.
या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ हे पुन्हा गोरखरपूरमधील पक्कीबाग येथील एका शाळेत मोहन भागवत यांना भेटले. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड जवळापास ३० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा – “RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…”
भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार मोहन भागवत यांनी गोरखपूरमध्ये येऊन योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट ही समान्य भेट नव्हती. दरम्यान, या भेटीकडे आता अनेक अर्थांनी बघितलं जात आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या निकालाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. खरं तर सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारपासून गोरखपूरमध्ये आहेत. त्यामुळे लवकरच मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होईल, अशी शक्यता वर्तवली बुधवारपासूनच जात होती. अखेर शनिवारी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.
© IE Online Media Services (P) Ltd