Hiccup: एखादी जवळची व्यक्ती आपली आठवण काढत असेल, तेव्हा आपल्याला उचक्या लागतात, असं तुम्ही एकदा तरी ऐकलं असेलच. आपल्यापैकी बरेचसे लोक या गोष्टींवर विश्वासदेखील ठेवतात. पण उचकी लागण्यामागे खरंच आठवण हे कारण आहे का? किंवा आपण जर कोणाची आठवण काढत असू, तर त्या व्यक्तीला उचक्या लागतात का? उचक्या लागणे यासंबंधित असे काही प्रश्न तुम्हाला कधी तरी पडले असतीलच. आठवण काढल्यामुळे उचक्या लागायला सुरुवात होते का, या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

उचक्या लागणे म्हणजे काय?

वैद्यकीय शास्त्रानुसार, उचकी लागणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये हवा जमा होते. अशा वेळी छाती आणि पोट यांच्यामध्ये डायाफ्राम या भागामध्ये कंपन व्हायला सुरुवात होते. या कंपनांमुळे लगेच डायाफ्राम आकुंचन पावतो. परिणामी श्वास घेतानाच्या फ्लोमध्येच ब्रेक होतो. काही सेकंदांसाठी श्वसनप्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाल्याने उचक्या लागतात.

उचकी लागण्यामागील अन्य कारणे

  • गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने पोटामध्ये गॅस तयार व्हायला लागतो. या गॅसमुळेही उचक्या लागू शकतात.
  • वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, श्वसनक्रिया किंवा पचनक्रिया यांमध्ये गडबड झाल्यास व्यक्तीला उचक्या लागायला सुरुवात होते.
  • जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही उचकी लागू शकते.
  • अतिप्रमाणात मद्यपान केल्यास उचक्या लागायला सुरुवात होत असते.
  • काही वेळेस आपण घाईत असताना अन्नपदार्थ न चावता गिळायला लागतो, अशा वेळीही उचकी लागते.
  • भात खाताना अनेकांना उचक्या लागतात. भात न चावता खाल्ल्यामुळे उचक्या सुरू होत असतात.

आणखी वाचा – गाय, म्हैस यांच्या दुधाऐवजी Almond Milk चे सेवन करणे योग्य असते का? जाणून घ्या याबाबत आहारतज्ज्ञांचे मत

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)