दामिनी नाथ, अरुण जनार्दन, अवनीश मिश्रा

नवी दिल्ली, चेन्नई, देहरादून : लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात आले असले तरी पहिल्या आणि सर्वात मेाठया टप्प्यातच मतदानात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. मतदानाबाबत मतदारांमध्ये उदासीनता असून मतटक्का वाढविण्याची चिंता निवडणूक आयोगाला आहे. पुढील सहा टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान झाले. या मतदारसंघात १६ कोटींहून अधिक मतदार असतानाही ६५.५० टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.५० टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध प्रयत्न केले असले तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्यात अपयश आले. निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर टर्नआऊट’ अ‍ॅपमध्ये शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मतदानांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. १०२ मतदारसंघांपैकी केवळ १० मतदारसंघांमध्येच अधिक मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी मतदान घटले, याचा अर्थ गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा ४८ लाख नोंदणीकृत मतदार मतदानासाठी आले नाहीत.

हेही वाचा >>> स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिला टप्प्यामुळेच मतदारांच्या उत्साहाबाबत अंदाज येतो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकाही एप्रिल व मे महिन्यात झालेल्या असतानाही पहिल्या टप्प्यात अधिक मतदान झाले. २०२९ मध्ये सात टप्प्यांपैकी सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात ६९.५ टक्के झाले होते. २०१४ मध्येही नऊ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ६९ टकके मतदान झाले होते. यंदा पाहिल्या टप्प्यातच कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मतदान वाढविण्याचे आव्हान आहे.

मतटक्का घसरण्याची कारणे..

‘इंडियन एक्सप्रेस’ने विविध राज्यांतील मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदानातील घट का झाली याची विविध कारणे देण्यात आली. उष्णतेत वाढ, लग्नसराई, उत्साहाचा अभाव अशी कारणे देण्यात आली. येत्या दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असल्याने निवडणूक आयोगासमोर महत्त्वपूर्ण आव्हान आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतरच्या टप्प्यांमध्ये मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी विविध मार्ग शोधावे लागतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

मतदान जागृतीसाठी विविध संकल्पना

* मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध समाजमाध्यमांचा वापर केला.

* टर्निग १८’ आणि ‘यू आर द वन’ यांसारखे अनोखे अभियान राबविले.

* आयोगाकडून ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या संकल्पनेच्या अंतर्गत अनुरूप संदेश धोरणाचा वापर सुरू केला.

* फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यू टय़ूब यांच्यासह सर्व मुख्य समाज माध्यम मंचावर निवडणूक आयोग सध्या सक्रीय असून सार्वजनिक अ‍ॅप, व्हॉट्सअप आणि लिंक्ड इन यांचाही वापर सुरू केला.

* विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून निवड केली.

* आयपीएल सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘बीसीसीआय’सह प्रयत्न केले. विविध भित्तीचित्रे, शालेय शिक्षक, पत्रके यांद्वारे जनजागृती.

मत’आलेख

राज्य          २०२४   २०१९

तामिनाडू      ६९.४६  ७२.४४

उत्तराखंड       ५५.८९  ६१.८८

राजस्थान      ५७.६५  ६४

छत्तीसगड      ६७.५३  ६६.२६

मेघालय       ७४     ७१

आसाम      ७५.९५  ७८.३३

’ आकडे टक्केवारीत