Jai Santoshi Maa completes 50 years: १९७५ सालचा उन्हाळा प्रचंड कडक होता. बिहारमधील आराह नावाच्या लहानशा शहरात एक विलक्षण प्रसंग घडत होता. सपना या स्थानिक सिनेमागृहाबाहेर जवळच्या गावांमधून बस, टांगा, बैलगाड्यांमधून येणाऱ्या महिलांची झुंबड उडाली होती, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पुरुष मंडळी बरोबर होतीच म्हणा.

त्यातील बहुतेकजणी पहिल्यांदाच सिनेमागृहात येत होत्या. सिनेमागृहात प्रवेश करण्यापूर्वी अनेक जण बाहेरच चपला काढत होते. काही जण तर अनवाणीच आले होते. मनात एकच ध्यास होता, तो म्हणजे त्यांना साक्षात संतोषी मातेच्या विराट रूपाचं दर्शन होणार होतं.

भल्या मोठ्या पडद्यावर दिसणारा जय संतोषी माँ हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर जनमानसाच्या श्रद्धेचे ते जिवंत चित्रण होते. यंदा या चित्रपटाला ५० वर्षं पूर्ण झाली.

भारतीय चित्रपटसृष्टीवर खोल ठसा

हे फक्त बिहार मध्येच घडत होत असं नाही, तर कमी अधिक फरकाने संपूर्ण भारतात हेच चित्र होतं. १९७५ साल हे भारताच्या इतिहासात अनेकार्थाने महत्त्वाचं ठरलं होतं.

जय संतोषी माँ हा चित्रपट देश आणीबाणीच्या उंबरठ्यावर असताना काही आठवडे आधी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती अगदीच तुटपुंज्या बजेटमध्ये झाली असली तरी चित्रपटाने मात्र भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला खोल ठसा उमटवला.

हाऊसफुल्लचे बोर्ड लागले

  • चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी संतोषी माता पडद्यावर दिसली की नाणी, फुलं, तांदूळ अर्पण केले जात होते. त्यावेळी ट्रेड गाईडने ‘शोले’ आणि ‘जय संतोषी माँ’ या दोन्ही चित्रपटांना ‘दीवार’ पेक्षा अधिक ब्लॉकबस्टर म्हणून रेटिंग दिलं होतं. या चित्रपटांनी अनेक शहरांमध्ये सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबली साजरी केली.
  • आराहमध्ये ‘शोले’ आठ आठवडे दाखवण्यात आला. तर, ‘जय संतोषी माँ’ १६ आठवडे चालला. किंबहुना जय संतोषी माँ या चित्रपटाचा मालाडमध्ये (मुंबई) महिला वर्गासाठी सकाळी ९ वाजता अतिरिक्त शो दाखवण्यात येत होता.
  • या चित्रपटाची जनमानसातील पकड इतकी जबरदस्त होती की, पुन्हा हा चित्रपट ५ वर्षांनी प्रदर्शित झाला त्यावेळीही हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते.

‘जय संतोषी माँ’ने मात्र चित्र पालटले

  • १९६० पर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत भक्तीपर चित्रपटांची निर्मिती नियमित सुरु होती. परंतु, त्यानंतर त्यात घट झाली.
  • १९७३ साली आलेला संपूर्ण रामायण हा चित्रपट वगळता इतर चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. सतराम रोहरा निर्मित ‘जय संतोषी माँ’ने मात्र हे चित्र पालटले.
  • त्यानंतर ‘जय’ या शब्दाने सुरु होणारे तब्बल ३० सिनेमे प्रदर्शित झाले, असे राजू भारतन यांनी ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’मध्ये १९७५ च्या हिंदी चित्रपटांच्या सारांशामध्ये नमूद केले आहे.

सामाजिक आणि धार्मिक प्रभाव

या चित्रपटाचा सामाजिक आणि धार्मिक प्रभाव दीर्घकालीन ठरला. ऑस्ट्रेलियन कला इतिहासतज्ज्ञ मायकेल ब्रँड यांनी १९८२ साली संतोषी मातेच्या धार्मिक पुस्तिकांवर सविस्तर संशोधन निबंध सादर केला.

मंदिरांची संख्या झपाट्याने वाढली..

  1. पश्चिम दिल्लीतल्या हरिनगर परिसरातील श्री संतोषी माता मंदिराचे प्रमुख अमित सक्सेना सांगतात की, १९७० च्या दशकात हे मंदिर एका लहान झोपडीत होते. आताचं मोठं मंदिर १९८१ साली बांधलं गेलं.
  2. १९८१ साली प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ वीणा दास यांनी लिहिलं की ‘जय संतोषी माता’ या चित्रपटाच्या यशानंतर संतोषी मातेच्या मंदिरांची संख्या झपाट्याने वाढली. फक्त नव्या मंदिरांचीच नव्हे, तर शीतला माता यांसारख्या देवींची मंदिरे जी पूर्वी बंद पडली होती, तीही संतोषी मातेच्या नावाने पुन्हा सुरू करण्यात आली. हे फक्त महानगरांमध्येच नाही, तर वाराणसीसारख्या तीर्थक्षेत्रांमध्येही घडलं, असं दास यांनी म्हटलं आहे.
  3. “चित्रपट पाहिल्यानंतर अनेक भक्तांना संतोषी मातेच्या मंदिराला भेट द्यावी, व्रत करावं किंवा तिथे बसून नम्रपणे नमन करावं, असं वाटायचं. त्यामुळेच त्या काळात अनेक मंदिरे उभी राहिली.” असं अमित सक्सेना सांगतात. ते पुढे म्हणतात, “देवी संतोषी माता आपल्याला सांगते की भौतिक गोष्टींच्या मागे लागू नका. आजच्या भौतिकतावादी जगात हेच अनेकांना आकर्षित करतं.” गुगल मॅप्सनुसार सध्या दिल्लीत किमान ३० संतोषी माता मंदिरं आहेत.

मध्यमवर्गीयांची संतोषी माता

कला इतिहासतज्ज्ञ मायकेल ब्रँड त्यांच्या लेखात लिहितात की, “ही देवी प्रामुख्याने मध्यमवर्गीय महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.” परंतु, आता मंदिरातील स्वयंसेवक सांगतात की, या देवीचे भक्त सर्वच स्तरांतील आहेत.

पश्चिम दिल्लीतल्या हरिनगर मंदिराच्या बाहेर अनेकदा महागड्या कारमधून भक्त येतात. “या मंदिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्यात डॉ. मनमोहन सिंग (तत्कालीन अर्थमंत्री), शीला दीक्षित, सुषमा स्वराज, किरण बेदी आणि जनरल व्ही. के. सिंग यांचा समावेश आहे,” असं सक्सेना सांगतात. दररोज सुमारे २०० भक्त मंदिरात येतात. परंतु, शुक्रवारच्या दिवशी अनेकजण देवीचे व्रत करतात, त्यामुळे ही संख्या सुमारे २,००० वर जाते.

“चित्रपटातलं भजन ‘करती हूँ तुम्हारा व्रत मैं, स्वीकार करो मा’ (गायिका: उषा मंगेशकर) भक्तांसाठी एक प्रकारचं घोषवाक्य आहे. हे प्रत्येक शुक्रवारी वाजवलं जातं,” असं सक्सेना सांगतात. नवरात्रीत मंदिर २४ तास दर्शनासाठी खुलं असतं आणि दररोज सुमारे १०,००० भक्त येतात.

मैं तो आरती उतारूं रे…

  • या चित्रपटातली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार सी. अर्जुन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांनी चार्टबस्टर स्थान मिळवलं.
  • ‘मैं तो आरती उतारूं रे’ उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं १९७६ च्या बिनाका गीतमालामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलं. या चित्रपटात उषा मंगेशकर यांनी तीन गाणी गायली.
  • महेंद्र कपूर आणि कवी प्रदीप यांचीही गाणी लोकप्रिय झाली. “ही गाणी ऑस्ट्रेलियामध्येही ऑल इंडिया रेडिओच्या विदेशी सेवेद्वारे ऐकली जात होती,” असं ब्रँड लिहितात.

शुक्रवारचं व्रत…

‘जय संतोषी माता’ चित्रपट एका नवविवाहित जोडप्याच्या संघर्षावर आधारित होता. सत्यवती (कनन कौशल) आणि तिचा नवरा (आशीष कुमार) दोघंही संतोषी मातेचे भक्त असतात. सत्यवतीवर अनेक संकटं येतात, पण ती आपल्या रक्षणकर्त्या देवीच्या कृपेने त्यावर मात करते. चित्रपटात नारदाची भूमिका पौराणिक चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता महिपाल यांनी केली होती. ते तिला शुक्रवारचे व्रत करण्यास सांगतात. सत्यवती सलग सोळा शुक्रवारी (सोळा शुक्रवारचे व्रत) व्रत करते आणि देवीला गूळ-चणे अर्पण करते.

पश्चिम दिल्लीतल्या मंदिराजवळ पूजा साहित्य विकणारे अजॉय किशन सांगतात की, ते दर शुक्रवारी गूळ-चण्याच्या किमान ५० पुड्या (प्रत्येकी १० रुपये) विकतात. “त्या दिवशी सुमारे १० तात्पुरते स्टॉल्स लागतात,” असंही ते सांगतात.

‘जय संतोषी माता’ चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षं झाली, तरीही संतोषी मातेचे भक्त वाढतच आहेत आणि त्यात आता इंटरनेटवरचेही भक्त सामील झाले आहेत. हा चित्रपट यूट्यूबवर आजवर २४ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, यातच आधुनिक काळातील त्याच्या लोकप्रियतेचे गणित पुरते लक्षात येते.