राखी चव्हाण
मानवी हस्तक्षेपामुळे जंगल संपत्तीचा ऱ्हास होत असून त्यामुळे आशियाई हत्तींच्या अधिवासाचे क्षेत्र कमी झाले आहे. हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याशिवाय रेल्वेखाली येऊन हत्तीच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. १९८०च्या दशकात सुमारे ९३ लाख हत्ती आशियात होते, तर सध्या ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे. त्यामुळे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संघटनेच्या लाल यादीत हत्तीचा समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्तीचे स्थलांतरण कुठून, कुठे?

महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि मध्य प्रदेश हे हत्तीचे पारंपरिक भूक्षेत्र नव्हते, पण महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांत गेल्या १५ वर्षांत हत्तीचे आगमन झाले असून, पारंपरिक हत्तींची भूमी म्हणून पश्चिम बंगाल, ओडीशा व कर्नाटकातील हत्तींनीही नवीन भूप्रदेशाकडे कूच केले आहे. बंदीपूर, मदुमलाई, वायनाड, नागरहोले या वनक्षेत्रामधून हत्ती मानवी वस्तीकडे आले आहेत. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आसाममधून महाराष्ट्रात हत्ती आले होते. खानापूर, कनकुंभी व जांबोटीमार्गे व दोडामार्ग मार्गे कोल्हापूरमधील आजरा-चंदगड या भागात हत्ती वनक्षेत्रात आले. ऑक्टोबर २००२ मध्ये हत्तींचे दोडामार्ग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा आगमन झाले.

हत्तीच्या स्थलांतरणाची कारणे काय?

दक्षिण भारतातील जंगलामध्ये घाणेरी व रानमोडी या वनस्पतींच्या बेसुमार वाढीमुळे हत्ती तसेच इतर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले आहे. अन्न-पाण्यासाठी नवीन क्षेत्र शोधणे हा हत्तींचा स्वभावधर्म आहे. कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड हे वनक्षेत्र व तेथील वनसंपदा मुबलक आहे. हत्तीचा अधिवास नाहीसा होत असल्याने हत्ती नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतर करत आहेत.

हत्तीची संख्या कमी होण्यामागील कारणे काय?

आशियाई हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे नष्ट झालेले अधिवास व त्यांच्या राहणीमानाच्या ठिकाणाची झालेली नासधूस. आशियातील काही भागांमध्ये हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. त्यामुळे त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. हत्तींच्या बहुतांश अधिवासांमधून रेल्वेमार्ग गेले आहेत. या मार्गावर रेल्वेची गती कमी असावी, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, दुर्लक्षामुळे रेल्वेच्या धडकेत हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय वीजप्रवाहामुळेदेखील हत्तीचे सर्वाधिक मृत्यू होतात. कारण बरेचदा वीजतारा लोंबकळत असतात. वीजतारांना सोंडेने स्पर्श केला तरीदेखील त्यांचा मृत्यू होतो. हत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान अधिक आहे आणि ते वाचवण्यासाठी वीजप्रवाहाचा वापर केला जातो. यात हत्तीचा मृत्यू होतो. भारतात गेल्या दहा वर्षांत सुमारे ४८२ हत्ती केवळ वीज प्रवाहामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

भारतातील हत्तींची संख्या किती?

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे २७ हजार ३१२ हत्ती आहेत. जगभरातील हत्तींच्या संख्येपैकी ५५ टक्के इतकी ही संख्या आहे. सुमारे १४ ते १५ राज्यातील २९ हत्ती संरक्षित क्षेत्र आणि हत्तींचा अधिवास असणाऱ्या दहा क्षेत्रांतून ही आकडेवारी समोर आली आहे.

‘प्रोजेक्ट एलिफंट’ची स्थिती काय?

वाघांची संख्या कमी झाल्याची देशभरात चर्चा होते, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नही होतात, पण वाघांप्रमाणेच हत्तीची संख्याही कमीकमी होत आहे. ६५ हजार चौरस किलोमीटरवर पसरलेले हत्तींसाठीचे २९ संरक्षित प्रदेशही या तस्करीबरोबरच अन्य आव्हानांचा सामना करत आहेत. सरकारने काही वर्षांपूर्वी ‘प्रोजेक्ट एलिफंट’ हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यात हत्तीच्या अधिवासाची सुरक्षा या मुद्द्याचा देखील समावेश होता. मात्र, सध्याची हत्तीच्या अधिवासाची स्थिती पाहता या प्रकल्पाचे काय झाले, याबाबत काहीही स्पष्टता नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why is the number of indian elephants declining so fast print exp 0622 abn