भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना महामारीशी निगडित एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून काही धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. करोना काळात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६.५ टक्के रुग्णांचा वर्षभरात मृत्यू झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. जगभरातील इतर देशांच्या आकडेवारीची तुलना करून ‘आयसीएमआर’ने हा निष्कर्ष काढलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहवालात काय नमूद करण्यात आले?

देशभरातल्या ३१ रुग्णालयांतील १४,४१९ करोना रुग्णांवर संशोधन करण्यात आले. सप्टेंबर २०२० पासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा या संशोधनात सहभाग करून घेतला आहे. याचा अर्थ यातील बऱ्याच जणांना मूळ डेल्टा किंवा ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, असा ‘आयसीएमआर’चा अंदाज आहे. मध्यम ते गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांवर या संशोधनात भर देण्यात आला आहे.

करोना रुग्णांच्या मृत्यूव्यतिरिक्त १७.१ टक्के रुग्णांमध्ये करोनापश्चात (Post Covid-19 conditions) आरोग्यविषयक तक्रारी दिसून आल्या आहेत. करोनातून बरे झाल्यानंतर १७.१ टक्के रुग्णांना थकवा, श्वास घेण्यास अडचण, धाप लागणे, एकाग्रता मंदावणे अशी लक्षणे आढळली आहेत. करोनातून बरे झाल्यानंतर ज्या रुग्णांना करोनापश्चात आजारांचा त्रास जाणवला त्यांच्या मृत्यूची शक्यता तीन पटींनी वाढली असल्याचा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) या अहवालाद्वारे काढला आहे.

हे वाचा >> एरिस, करोनाचा नवा अवतार, काय काळजी घ्याल?

या अहवालात इशारा देण्यात आला आहे की, जागतिक आरोग्य संघटना (WHO) किंवा सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) या संस्थांनी घालून दिलेल्या ‘करोनापश्चात परिस्थिती’च्या व्याख्येचा इथे वापर केलेला नाही. ही व्याख्या रुग्णांची नोंदणी झाल्यानंतर तयार करण्यात आली. ‘आयसीएमआर’ने रुग्णालयातून बरे झाल्यानंतर चार आठवड्यांनी ज्या रुग्णांनी आरोग्यविषयक तक्रारी केल्या होत्या, त्यांच्यावर देखरेख ठेवून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यामध्ये थकवा, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे किंवा आकलनविषयक समस्यांचा अंतर्भाव दिसून आला.

लसीकरणाबाबतही या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विषाणूचा संसर्ग होण्याआधी ज्या रुग्णांनी करोना प्रतिबंधक लशीचा एक डोस घेतला होता, त्यांच्यामध्ये एका वर्षाच्या काळात ६० टक्के कमी मृत्यूचा धोका दिसून आला.

मृत्यूचा धोका कुणामध्ये अधिक प्रमाणात?

करोना संसर्गाच्या एका वर्षानंतर मृत्यूचा धोका वाढविण्यामध्ये गंभीर आजार, वय व लिंग हे घटक कारणीभूत ठरलेले आहेत. या संशोधनातून असे दिसून आले की, ज्या रुग्णांना एक गंभीर आजार होता, अशा रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका संसर्गाच्या एका वर्षात नऊ पटींनी वाढला होता. अहवालातील आकडेवारीनुसार, पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता १.३ पट अधिक होती; आणि तर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता २.६ पट अधिक होती.

करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर ० ते १८ वयोगटातील लहान मुलांमध्ये ५.६ पटींनी मृत्यूचा धोका असल्याचे पहिल्या चार आठवड्यांत तपासणी केल्यानंतर आणि वर्षभरात केलेल्या पाठपुराव्यानंतर लक्षात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच चार आठवड्यांत हा धोका १.७ पटीने वाढला म्हणजेच वर्षाच्या उत्तरार्धात अधिक मुले मरण पावली. रुग्णालयात दाखल झालेल्या लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाचे विकार, रक्तविकार अशा घातक व्याधी आढळून आल्या होत्या, असे याआधी आलेल्या अहवालात निदर्शनास आले होते. लहान मुलांचे अधिक मृत्यू होण्यास ही एक शक्यता गृहीत धरली जाऊ शकते, असे या नव्या अहवालात म्हटले आहे.

हे वाचा >> करोनाची लाट पुन्हा अमेरिकेच्या दाराशी? रुग्णभरती वाढली; आरोग्य संस्थांचा सतर्कतेचा इशारा!

गंभीर व्याधीमुळे मृत्यूचा धोका जास्त पटीने वाढतो, असे विधान या अहवालाशी निगडित असलेल्या ‘आयसीएमआर’मधील माजी शास्त्रज्ञाने दिली. ते म्हणाले, “या निष्कर्षावरून स्पष्ट दिसते की, गंभीर व्याधी हा एक मोठा आणि महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे. त्यामुळे कोणत्याही गंभीर व्याधी असलेल्या रुग्णांनी जसे की, लिव्हर सिरॉसिस, क्रॉनिक किडनी डिसीज, असे आजार असलेल्यांनी अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण- त्यांना इतर गंभीर आजार आणि आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे आणि वेळोवेळी आरोग्याच्या परिस्थितीचे निरीक्षण करावे.

करोनाचा सौम्य संसर्ग झालेल्यांना करोनापश्चात त्रास होऊ शकतो?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने नवी दिल्लीमधील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाचे अंतर्गत औषध सल्लागार डॉ. सुरणजित चॅटर्जी यांचे मत मांडले आहे. या अहवालाशी डॉ. चॅटर्जी यांचा संबंध नव्हता. ते म्हणाले, “आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यावरून ज्यांना करोनाचा सौम्य संसर्ग झाला होता, अशा लोकांमध्येही दीर्घकाळ करोनापश्चात लक्षणे दिसू शकतात. मात्र, योग्य उपचार आणि औषधांनी परिस्थिती सुधारू शकते.”

गंभीर व्याधींचा धोका असणाऱ्यांनी लस घ्यावी?

याबाबत डॉ. चॅटर्जी म्हणाले की, गंभीर व्याधी असलेल्या ज्या रुग्णांना करोनाचा सौम्य संसर्ग झाला होता, त्यांनी कोणतीही अतिरिक्त लस किंवा इतर औषधे सध्या घेण्याची गरज नाही. त्यांनी केवळ खोकला, सर्दी यांसारख्या श्वासोच्छवासाशी संबंधित लक्षणांवर लक्ष ठेवावे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icmr report on covid 19 deaths what are the symptoms of illness after corona kvg