काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (७७) आणि त्यांचा मुलगा नकुल (४९) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमलनाथ यांना अनेक मुद्द्यांवरून भाजपाकडून वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. १९८४ च्या शीखविरोधी हत्याकांडातील त्यांच्या कथित भूमिकेमुळे भाजपामधील एक गटही त्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या विरोधात आहे. १९८४ शीख दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना पक्षात घेतल्याने शीख समुदायात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये नुकसान होऊ शकते. पक्षाच्या शीख नेत्यांचा असा दावा आहे की, त्यांनी पक्षाच्या योग्य व्यासपीठावर त्यांचे विचार मांडले आहेत आणि कमलनाथ यांना पक्षात घेण्याबाबत त्यांचे मतभेद नोंदवले आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात असताना आणि लोकसभा निवडणुकीत ३७० जागा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज होण्यास सांगत असताना पक्षात ही भांडणे सुरू झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, त्या वर्षी जूनमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दिल्लीत नरसंहार उफाळून आला. १ नोव्हेंबर रोजी सुमारे ४ हजार लोकांच्या जमावाने संसद भवनाशेजारी नवी दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या गुरुद्वारा रकाब गंजला वेढा घातला. गुरुद्वाराच्या आत शिखांवर दगडफेक केली, अशी माहिती मनोज मिट्टा आणि एचएस फुलका यांनी व्हेन ए ट्री शूक दिल्ली या त्यांच्या (२००७)च्या पुस्तकात दिली आहे.

कमलनाथ यांनी दाखल केलेले उत्तर संभ्रमात टाकणारे

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या साक्षीदारांनी काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव घेतले होते. परंतु नानावटी आयोगाने सांगितले की, त्यांना दोषी ठरवणे शक्य नाही. शीखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगाने संसदेजवळील गुरुद्वारा रकाबगंजवरील हल्ल्याची चौकशी केली, तेव्हा त्यांना असे आढळून आले की, “कमलनाथ यांनी दाखल केलेले उत्तर संभ्रमात टाकणारे होते. पुराव्यावरून असे दिसून येते की ते गर्दीत दिसले होते. परंतु त्यांनी त्यांच्या आगमनाची आणि तिथून निघण्याची वेळ स्पष्टपणे सांगितली नाही.” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याविरोधात दोन साक्षीदार समोर आले होते. आयोगाने शेवटी असा निष्कर्ष काढला की, “पुराव्याअभावी कमलनाथ यांनी कोणत्याही प्रकारे जमाव भडकावला किंवा गुरुद्वारावरील हल्ल्यात त्याचा सहभाग असण्याची शक्यता नाही.”

शीखविरोधी दंगलीतील कमलनाथ यांची कथित भूमिका गुरुद्वाराच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहणारा साक्षीदार मुख्तार सिंग आणि साक्षीदार संजय सुरी यांच्या साक्षीवर आधारित होती, जे त्यावेळी इंडियन एक्सप्रेसचे स्टाफ रिपोर्टर होते. सुरू म्हणाले, “१ नोव्हेंबर १९८४ रोजी गुरुद्वारा रकाबगंजवर हल्ला झाला आणि तो सुमारे अर्धा तास चालला. तेथे काही पोलीस कर्मचारी असूनही कारवाई झाली नाही. हल्ला थांबवण्यासाठी आलेला एक वृद्ध शीख आणि त्याच्या मुलाला जमावाने जाळून टाकले.”

….अन् एका व्यक्तीने जमावाला घाबरवण्यासाठी परवानाधारक शस्त्रातून हवेत काही गोळ्या झाडल्या

सुरी यांच्या विधानाच्या आधारे आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, “जमाव गुरुद्वारामध्ये प्रवेश करताच मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो यशस्वी झाला नाही. यानंतर आग लावण्यात आली. मुख्तार सिंग आणि अन्य भाविकांसह कर्मचाऱ्यांनी आग विझवली. फटाके फोडून ​​दगडफेक करून जमावाला हुसकावून लावले. फटाके फोडल्याचा आवाज ऐकून जमावाला गोळीबार आहे, असे वाटले आणि ते पळून गेले. जमावाने पुन्हा एकदा गुरुद्वारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने जमावाला घाबरवण्यासाठी परवानाधारक शस्त्रातून हवेत काही गोळ्या झाडल्या.

सुरी यांनी आयोगाला सांगितले की, पहिल्यांदा माघार घेतल्यानंतर गर्दी वाढली होती आणि त्यावेळी काँग्रेस नेते कमलनाथ आणि वासंद साठे गर्दीत दिसले. अहवालात पुढे म्हटले आहे की, “काँग्रेस नेत्याच्या सूचनेनंतर पोलिसांनी गुरुद्वारावर गोळीबार केला. काही वेळानंतर गुरुद्वाराचे व्यवस्थापक गुरदिल सिंग यांनी काँग्रेस नेत्यांना जमावाला हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आणि त्यांना निघून जाण्यास सांगितले. त्यांच्या आवाहनानंतर जमाव मागे हटला, पण काही वेळाने पुन्हा गुरुद्वाराजवळ मोठा जमाव जमला.

सुरी यांनी आयोगाला सांगितले की, ते दुपारी चारच्या सुमारास गुरुद्वारा रकाबगंज येथे गेले होते आणि त्यांनी कमलनाथ यांना सुमारे ४ हजार लोकांच्या गर्दीचे नेतृत्व करताना पाहिले. रिपोर्टमध्ये सुरीच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जमाव गुरुद्वारामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होता. पण काँग्रेस खासदार आणि इतर काँग्रेस नेते गर्दीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. कमलनाथ यांनी गुरुद्वाराजवळ गर्दी रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असेही सुरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. अहवालात सुरीच्या हवाल्याने म्हटले आहे की, “कमलनाथ गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होते आणि जमाव त्यांच्या सूचनांची वाट पाहत होता. कमलनाथ यांनी दिलेल्या कोणत्याही सूचना सुरींनी ऐकल्या नाहीत. सुरींच्या लक्षात आले की तो गर्दीतल्या लोकांशी बोलत आहे.”

हेही वाचाः रशियन सैन्याकडून युद्धात स्टारलिंकचा वापर? युक्रेनचा गंभीर आरोप, एलॉन मस्कची भूमिका काय? वाचा सविस्तर…

आयोगाने मागितलेल्या उत्तरात कमलनाथ यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले की, १ नोव्हेंबर १९८४ रोजी दुपारी त्यांना गुरुद्वाराजवळ हिंसाचार झाल्याची माहिती मिळाली आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे तेथे जाण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टमध्ये कमलनाथ यांच्या वक्तव्याचा हवाला देत म्हटले आहे की, “जेव्हा कमलनाथ तेथे पोहोचले, तेव्हा निमलष्करी दलाचे जवानही तेथे उपस्थित होते. त्यांनी गर्दीत उपस्थित लोकांकडून ते काम जमले आहेत हे जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगण्यात आले की, गुरुद्वारामध्ये काही हिंदू स्त्री-पुरुषांना ओलीस ठेवण्यात आले होते आणि हेच संतापाचे सर्वात मोठे कारण होते. मात्र यावेळी पोलीस आयुक्त तेथे पोहोचले आणि त्यांना पोलीस संपूर्ण परिस्थिती हाताळतील, असे आश्वासन देण्यात आले. कायदा हातात घेऊ नका, असे आवाहनही कमलनाथ यांनी उपस्थित लोकांना केले. त्यांनी कोणालाही गोळीबार करण्याची सूचना दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले. कमलनाथ यांनी हेदेखील नाकारले की, याआधी त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारच्या गर्दीचे नेतृत्व किंवा नियंत्रण केले होते.

हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, भरावा लागणार ३५५ दशलक्ष डॉलरचा दंड, नेमकं कारण काय?

कमलनाथ यांच्या वक्तव्यावर आयोगाने निष्कर्ष काढला की, “कमलनाथ यांचे विधान पूर्णपणे अस्पष्ट आहे. ते तिथे किती वाजता गेले आणि किती वेळ राहिले हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. सकाळी साडेअकरा ते साडेतीन वाजेपर्यंत गुरुद्वाराजवळची परिस्थिती बिकट होती. दुपारी दोनच्या सुमारास ते गर्दीत दिसल्याचे पुरावे सांगतात. गुरुद्वारात ते कोणाबरोबर किंवा एकटे गेले होते आणि कसे गेले हेही त्यांनी सांगितले नाही. मात्र, २० वर्षांनंतर कमलनाथ यांच्याकडून तपशील विचारला जात आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती देता आली नसल्याचीही शक्यता आहे. सुरी यांनी दिलेल्या विधानाच्या आधारे असे म्हणता येणार नाही की, कमलनाथ यांनी जमावाला कोणत्याही प्रकारे भडकावले आहे. सिंह ज्या ठिकाणी कमलनाथ उभे होते, त्या ठिकाणापासून दूर होते. त्यामुळे पुराव्याअभावी कमलनाथ यांनी कोणत्याही प्रकारे जमावाला भडकावले होते किंवा गुरुद्वारावरील हल्ल्यात त्यांचा हात होता, असे म्हणणे आयोगाला शक्य नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal nath on bjp path but trouble due to 1984 riots read what really happened 40 years ago vrd
Show comments