गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीने विशेषतः स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या समभागांनी बहुप्रसवा परतावा देऊन  गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. सरलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाने नेमका किती नफा गुंतवणूकदारांच्या पदरी घातला आहे ते जाणून घेऊया.

सरलेल्या वर्षात शेअर बाजारातून किती परतावा?

आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील सुमार कामगिरीनंतर सरलेले २०२३-२४ वर्ष गुंतवणूकदारांसाठी विशेष उल्लेखनीय ठरले आहे. देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी आश्चर्यकारक कामगिरी दाखवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-फिफ्टीने २७ टक्क्यांपेक्षा जास्त दुहेरी अंकी परतावा दिला. मात्र सरलेल्या वर्षात सर्वाधिक तेजीची जादू बाजारातील छोटे उस्ताद अर्थात, स्मॉलकॅप कंपन्यांनी दाखवली. बेंचमार्कला मोठ्या फरकाने मागे टाकत, निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकाने सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ६३ टक्के परतावा दिला आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल तब्बल १२५ लाख कोटी रुपयांनी वधारले. या काळात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी, सर्व मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक आणि अनेक क्षेत्रीय निर्देशांकांनी ऐतिहासिक अशी विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. कंपन्यांची मजबूत कमाई, सरकारची उच्च भांडवली गुंतवणूक, मजबूत देशांतर्गत आर्थिक वाढ आणि अनुकूल आर्थिक धोरण परिस्थिती हे दलाल स्ट्रीटवरील मोठ्या तेजीचे प्रमुख घटक ठरले.

हेही वाचा >>> X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

तेजीचे भागीदार कोण?

भांडवली बाजाराला उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर अचानक प्रकाशझोत आला, त्यांच्या समभागांनी कमावलेल्या बहुप्रसवा मोलाने एकंदर भांडवली बाजाराला दिशा देण्यात भूमिका बजावली. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७३ हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. हे बाजार भांडवल सुमारे ४६.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकूण बाजार भांडवलात सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा सुमारे १३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. खासगी क्षेत्रातील बड्या उद्योगसमूहांचाही यात सहभाग आहे. अदानी, रिलायन्स आणि टाटा समूहानेदेखील ‘सेन्सेक्स’च्या मुसंडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा समूहाचे एकंदर बाजार भांडवल २२.४८ लाख कोटींवरून, २७.४१ लाख कोटींवर पोहोचले आहे. रिलायन्स समूहाचे बाजार भांडवल १६.८७ लाख कोटींवरून, २०.१३ लाख कोटींवर, तर अदानी समूहाचे ९.७८ लाख कोटींवरून, १६.२२ लाख कोटींवर पोहोचले आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकातील १,००० कंपन्यांच्या समभागांचे एकत्रित बाजार भांडवल सरलेल्या आर्थिक वर्षात २६ लाख कोटी रुपयांनी वाढून ६६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या कालावधीत केवळ १२४ स्मॉल कॅप कंपन्यांनी केवळ नकारात्मक परतावा दिला. निफ्टी-फिफ्टीमधील समभागांमध्ये, कोल इंडिया, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो हे गुंतवणूकदारांचे सर्वाधिक आवडते समभाग ठरले, कारण त्यांनी २०२३-२४ मध्ये तब्बल १०१ टक्के ते १३६ टक्के परतावा दिला. बेंचमार्क निर्देशांकाचा भाग असलेल्या सुमारे ४२ कंपन्यांच्या समभागांनी ९५ टक्क्यांपर्यंत दुहेरी-अंकी परतावा दिला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखण्याऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने  २८ टक्के तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सुमारे २० टक्के परतावा दिला.

परदेशी गुंतवणूकदारांची किती गुंतवणूक?

जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत आहे. या आशावादाने प्रेरित होऊन परदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतर्गत भांडवली बाजारामध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) शेअर बाजारात सुमारे २.०८ लाख कोटी रुपये आणि रोखे बाजारात १.२ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. त्यांनी एकत्रितपणे, भांडवली बाजारात ३.४ लाख कोटी रुपये ओतले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये भारतीय भांडवली बाजाराकडे पाठ फिरवल्यानंतर आर्थिक वर्ष २०२३-२४ दमदार पुनरागमन केले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, जागतिक पातळीवर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आक्रमक दर वाढ केल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून नक्त ३७,६३२ कोटी रुपये माघारी घेतले होते. त्याआधीच्या वर्षात १.४ लाख कोटी रुपये काढले. मात्र, २०२०-२०२१ मध्ये, परदेशी गुंतवणूकदारांनी २.७४ लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक केली होती.

हेही वाचा >>> हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

परदेशी गुंतवणूकदार पुनरागमनाचे कारण काय?

परदेशी गुंतवणूकदारांकडून येणारा प्रवाह हा विकसित बाजारपेठेतील चलनवाढ आणि व्याजदर परिस्थितीवर अवलंबून असून यामध्ये मुख्यतः अमेरिका आणि इंग्लंड आघाडीवर आहेत. एकंदरीत, परदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून सकारात्मक सुरुवात केली आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या आशादायी मार्गक्रमणामुळे ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीचा कल कायम होता. या पाच महिन्यांत त्यांनी १.६२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर, परदेशी गुंतवणूकदार सप्टेंबरमध्ये निव्वळ विक्रेते बनले आणि ऑक्टोबरमध्येही मंदीची स्थिती कायम राहिली आणि या दोन महिन्यांत ३९,००० कोटींहून अधिक रक्कम काढून घेतली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये ते निव्वळ गुंतवणूकदार बनले आणि डिसेंबरमध्येही त्यांनी ६६,१३५ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. मात्र जानेवारीत पुन्हा त्यांनी २५,७४३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. शिवाय सप्टेंबर २०२३ मध्ये, जेपी मॉर्गनने त्यांच्या बेंचमार्क इमर्जिंग मार्केट निर्देशांकात भारत सरकारच्या रोख्यांचा जून २०२४ पासून समावेश करण्याची घोषणा केली. नियोजित केलेल्या या महत्त्वाच्या समावेशामुळे येत्या १८ महिने ते २४ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० अब्ज ते ४० अब्ज डॉलर गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. या प्रवाहामुळे भारतीय रोखे परदेशी गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होतील आणि रुपयाला संभाव्य बळकटी मिळेल, असे मत मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे हिमांशू श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

जागतिक भांडवली बाजारांमध्ये भारत कितवा?

देशांतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन ४.३३ लाख कोटी डॉलरपुढे पोहोचले आहे. परिणामी भारतीय भांडवली बाजाराने जागतिक पातळीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या बाजारांमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे हाँगकाँग ४.२९ लाख कोटी डॉलर बाजार मूल्यासह पाचव्या स्थानावर गेला आहे. अर्थात भारतीय भांडवली बाजार आणि हाँगकाँगच्या बाजार भांडवलात फारसा फरक नसल्याने ही चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात ५ डिसेंबर रोजी भारतीय भांडवली बाजाराने ४ लाख कोटी बाजार मूल्यांकनाचा टप्पा ओलांडला. गेल्या पाच वर्षांत बाजार मूल्यांकनात २ लाख कोटी डॉलर मूल्याची भर पडली. विद्यमान जानेवारी महिन्यातील सरलेला आठवडा वगळता भांडवली बाजारावर तेजीवाल्यांचा पगडा राहिलेला आहे. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डीमॅट खात्यांची संख्या १३ कोटींपुढे पोहोचली असून दर महिन्याला त्यात सरासरी ३० लाख नवीन खात्यांची भर पडते आहे. 

बाजार तेजीत सेबीकडून मिठाचा खडा?

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, देशात सध्या २७ स्मॉल-कॅप फंड आणि २९ मिड-कॅप फंड आहेत, ज्यांच्याकडून अनुक्रमे २.४ लाख कोटी रुपये आणि २.९ लाख कोटी रुपये व्यवस्थापित केले जातात. मात्र भांडवली बाजार नियामक सेबीने स्मॉल-कॅप फंडांमधील तरलतेच्या मुद्द्याशी संबंधित आणि कंपन्यांच्या समभागांचे वाढलेले मूल्यांकन याविषयी चिंता व्यक्त केली. यावर योग्य तोडगा काढण्यासाठी सेबीने म्युच्युअल फंड घराण्यांना स्ट्रेस टेस्ट करण्यास सांगितले. परिणामी वर्षाच्या अखेरीस स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis midcap and smallcap stocks surged in last financial year print exp zws
First published on: 01-04-2024 at 07:00 IST