Mumbra Train Accident: सोमवार, ९ जून रोजी मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

सकाळी ९.२० च्या दरम्यान दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्डवर) लटकत उभे होते.

त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले. या दुर्घटनेनंतर १९९३ साली कांदिवली- बोरिवली दरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या स्मृती जाग्या झाल्या. काय घडले होते नेमके तेव्हा?

जगातील पहिली ‘लेडीज स्पेशल’

  • ५ मे हा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि विशेषतः महिला प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
  • ५ मे १९९२ रोजी जगातील पहिली ‘लेडीज स्पेशल’ लोकल ट्रेन चर्चगेट ते बोरीवली मार्गावर सुरू करण्यात आली.
  • ५ मे २०२५ रोजी या ऐतिहासिक प्रवासाचा ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरला, कारण संपूर्ण ट्रेन केवळ महिला प्रवाशांसाठी समर्पित करण्यात आलेली होती.

आरामदायक व सुरक्षित प्रवास

  • पश्चिम रेल्वेवर धावणारी ही पहिली लेडीज स्पेशल सुरुवातीला चर्चगेट ते बोरीवली दरम्यान चालवली गेली आणि १९९३ मध्ये ती विरारपर्यंत विस्तारण्यात आली.
  • ही सेवा कष्टकरी महिलांसाठी एक वरदान ठरली. पूर्वी त्यांना सामान्य लोकलच्या महिला डब्यात चढण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. मात्र, संपूर्ण ट्रेन महिला प्रवाशांसाठी राखीव केल्यामुळे प्रवास अधिक आरामदायक व सुरक्षित झाला आणि हाच या सेवेचा प्रमुख उद्देश होता.
  • मुंबईच्या सर्वात व्यग्र उपनगरी रेल्वेमार्गांपैकी एकावर ३३ वर्षे यशस्वीपणे धावणारी ही सेवा महिला प्रवाशांसाठी एक आशीर्वादच ठरली आहे.

‘टॉक-बॅक सिस्टम’

महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने काही वर्षांमागे महिला दिनानिमित्त ‘टॉक-बॅक सिस्टम’ ही नवीन सुरक्षा यंत्रणा सुरु केली. या प्रणालीमध्ये महिलांच्या डब्यात आपत्कालीन परिस्थितीत एका बटणावरून ट्रेनमधील गार्डशी थेट संवाद साधता येतो. सुरक्षेची किंवा आरोग्यविषयक गरज असल्यास ही सुविधा महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

तो दुर्दैवी दिवस

त्या दुर्दैवी दिवशी १९९३ साली मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातून लेडीज स्पेशल उपनगरीय लोकल बोरीवलीच्या दिशेनं निघाली होती.

  1. ही घटना संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कांदिवली- बोरिवली रेल्वे स्थानकांदम्यान घडली. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता.
  2. लोकलने कांदिवली स्थानक सोडलं आणि बोरीवली स्थानक येण्यापूर्वी ही घटना घडली. त्याच दरम्यान लोकलमध्ये आग लागल्याची अफवा पसरली.
  3. आगीची अफवा पसरताच महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला प्रवाशांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी वेगात असलेल्या धावत्या लोकलमधून उड्या मारल्या.
  4. प्रत्येक जण जीवाच्या आकांतानं लोकलबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र दुर्दैवानं बाजूच्याच रुळावरून विरुद्ध दिशेने वेगात चाललेल्या लोकलखाली त्या महिला आल्या.
  5. पावसानं देखील रौद्ररुप धारण केलं होतं. वीजपुरवठासुद्धा खंडित झाल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. या दुर्घटनेत तब्बल ४९ महिलांना जीव गमवावा लागला.

धूर येताना पाहिला अन्…

  • कांदिवली स्टेशन सोडल्यानंतर एका महिलेला लोकलच्या डब्यात धूर येत असल्याचे दिसले. त्यामुळे आग लागल्याचा तिचा गैरसमज झाला. तिने आग लागल्याचे ओरडून सांगितले.
  • त्यानंतर लोकलच्या डब्यात एकच गोंधळ झाला. महिला जीव वाचविण्याकरिता पळापळ करू लागल्या. परिणामी, डब्यात चेंगराचेंगरी सुद्धा झाली.
  • यावेळी काही महिलांनी लोकलची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकल न थांबल्याने महिलांनी बाहेर उड्या मारल्या.

…पुन्हा डोळे पाणावले

  • ही घटना घडली तेव्हा मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू होता. यातीलच विजेचा लोळ रेल्वेच्या ओव्हरहेड वायरजवळ चमकल्याने आग लागली असावी, असं महिलांना वाटले आणि त्यांनी भीतीने डब्यातून उड्या मारल्या असाव्यात, असे या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देताना त्यावेळेस म्हटले होते.
  • कांदिवली स्थानकाजवळ घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर घटनास्थळाचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलने महिलांना चिरडले होते. यातील महिलांचे मृतदेह ओळखण्याच्या स्थितीतही नव्हते. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणीही साचले होते. त्याच अवस्थेत बचाव कार्य करावे लागले होते. आजच्या दिवा- मुंब्रा दरम्यान घडलेल्या या अपघातानंतर बोरिवली अपघाताच्या या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आणि मुंबईकरांचे डोळे पाणावले!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai train accident diva mumbra train accident recalls 1993 accident that killed 49 at kandivali borivali svs