पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर लक्षद्वीप बेटांचे नाव चर्चेत आले आहे. लक्षद्वीप हे भारतीय उपखंडातील सर्वात सुंदर, निसर्गरम्य स्थळांच्या यादीतील एक अज्ञात हिरा म्हणून ओळखले जाणारे स्थळ आहे. निळ्याशार समुद्राच्या मध्यभागी वसलेल्या या बेटांकडे आजतागायत पर्यटकांचे फारसे लक्ष गेले नव्हते, सांस्कृतिकदृष्ट्या ही बेटे अद्वितीय आहेत. तेथील बहुसंख्य रहिवासी मुस्लीम असले तरी, लक्षद्वीपमध्ये पाळला जाणारा इस्लाम भारतात इतर कोठेही पाळला जातो त्यापेक्षा वेगळा आहे. या बेटांवरील रहिवाशांचा सांस्कृतिक आणि भाषिक संबंध मल्याळी, अरब, तमिळ आणि कन्नडिगांशी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेटावरील इस्लामपूर्व हिंदू समाज

इस्लामिक विषयाचे अभ्यासक अँड्र्यू डब्ल्यू फोर्ब्स यांनी नमूद केले आहे की “लक्षद्वीप बेटांवर प्रथम स्थायिक झालेले रहिवासी मलबारी खलाशीच होते का? हे सांगणे थोडे कठीणच आहे, परंतु ते समुद्रमार्गे या बेटावर स्थलांतरित झाले आहेत, हे मात्र नक्की” (सोर्स टुवार्ड्स द हिस्टरी ऑफ आयलँड, २००७). या रहिवाशांचे स्थलांतर सांगणाऱ्या कथा, गोष्टी यांवर पूर्णतः अवलंबून राहणे कठीण असले तरी, त्यांच्या स्थलांतराचा संदर्भ आपल्याला स्थानिक दंतकथांमधूनही मिळतो. फोर्ब्स यांनी नमुद केल्याप्रमाणे, ‘स्थलांतराची एक लाट इसवी सन सातव्या शतकात आली होती, हे सूचित करणारे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत, परंतु ती नेमकी कधी सुरू झाली हे सांगणे अशक्य आहे. परंतु हे स्थलांतरित बहुसंख्य मलबारी हिंदू होते.

अधिक वाचा: विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !

पूर्वीचे हिंदू?

“लक्षद्वीप बेटांची विद्यमान जातिरचना कदाचित त्या काळातील आहे, ते मातृसत्ताक समाज रचनेचे (मारुमाक्कथायम मातृवंशीय) अनुसरण करतात. या शिवाय बेटांवर पूर्व-इस्लामिक हिंदू समाजाचे अस्तित्व सांगणाऱ्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत, इतकेच नाही तर रामपूजा, सर्पपूजा यांचा वारसा दर्शवणारी अनेक लोकगीते प्रचलित आहेत.

बेटवासीयांनी इस्लाम का स्वीकारला?

फोर्ब्स यांचा असा विश्वास आहे की अरब आणि मलबार किनारपट्टी दरम्यान प्रवास करणारे अरब व्यापारी आणि खलाशी यांच्याशी नियमित संपर्क आल्याने बेटवासीयांनी इस्लाम स्वीकारला. उल्लेखनीय म्हणजे, लक्षद्वीपमध्ये इस्लामिक प्रभाव मलबारच्या मपिला समुदायाऐवजी अरबांच्या माध्यमातून आला. “लक्षद्वीप बेटवासी मुख्य भूभागाच्या मपिलापेक्षा अरबी मिश्रित मल्याळम बोलतात आणि मल्याळी लिपीऐवजी अरबीमध्ये मल्याळम लिहितात,” असे फोर्ब्स यांनी नमूद केले आहे. “उत्तर भारताच्या तुलनेत लक्षद्वीप बेट, केरळ, तामिळनाडूसह हिंद महासागरात इस्लामचा राजकीय परिचय लक्षणीयरीत्या कमी होता,” इतिहासकार महमूद कुरिया यांनी २०२१ मध्ये द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “इस्लामची ओळख या भागात प्रामुख्याने व्यावसायिक माध्यमातून झाली. ही बेटे मुख्य भूमीपासून एकटी पडल्याने, या भागात संस्कृती वेगळ्या प्रकारे विकसित झाली.

१६ व्या शतकात, केरळमध्ये राज्य करणारे एकमेव मुस्लिम राजवंश कन्नूरच्या अरक्कल राज्याच्या नियंत्रणाखाली ही बेटे आली. या राजसत्तेची युरोपीय शक्तींशी वारंवार भांडणे होत होती, यामुळे लक्षद्वीपवर नियंत्रण ठेवणे ही प्रतिष्ठेची बाब होती. “पोर्तुगीजांनी हे बेटं ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि सोळाव्या शतकाच्या मध्यात त्यांच्याकडून शेकडो स्थानिकांची हत्या करण्यात आली,” असे इतिहासकार मनू पिल्लई यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “पोर्तुगीजांनी कोलाथिरी आणि अरक्कल सारख्या मुख्य भूप्रदेशाच्या राज्यकर्त्यांशी करार केल्यामुळे, बेटांना शेवटी काही प्रमाणात संरक्षण मिळाले.” हे संरक्षण काही प्रमाणात ब्रिटिश राजवटीत चालू राहिले. अरक्कल राज्याला मलबारमधील बहुतेक जमीन समर्पित करण्यास भाग पाडले गेले होते, तेव्हा त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर राजसत्तेच्या खंडणीच्या बदल्यात लक्षद्वीपचा काही भाग १९०८ पर्यंत राखून ठेवला. लक्षद्वीपच्या भौगोलिक एकल अस्तित्त्वामुळे वसाहतवादाचा परिणाम भारताच्या इतर भागांच्या तुलनेत झाला नाही, येथील संस्कृती आणि समाज भारताच्या इतर भागांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने विकसित झाला. कूरिया यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, कोणत्याही एका सांस्कृतिक प्रभावाने बेटांवर वर्चस्व गाजवले नाही, म्हणूनच या भागात मल्याळम, जझारी आणि महल या तीन मुख्य भाषा आहेत.

अधिक वाचा: जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

मातृवंशीय समाज

लक्षद्वीपच्या इस्लामिक समाजाला खरोखर अद्वितीय बनवणारी गोष्ट म्हणजे मातृत्वाची परंपरा , या परंपरेत वंश आणि मालमत्ता आईकडून मुलीकडे हस्तांतरित होते. मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांनी मॅट्रिलिनी अँड इस्लाम: रिलिजन अँड सोसायटी इन द लॅकॅडिव्स (१९६९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, “कदाचित कोठेही आढळणार नाही, अशी इस्लामच्या विचारसरणीशी विसंगत सामाजिक व्यवस्था येथे आहे. पिल्लई यांनी लक्षद्वीपच्या केरळशी जोडलेल्या मातृवंशीय परंपरेकडे लक्ष वेधले. “अमिनी, कल्पेनी, आंद्रोट, कावरत्ती आणि अगट्टी ही सर्वात जुनी बेटं वस्ती आहे आणि इथली काही कुटुंबे मुख्य भूमीवरील नायर आणि नंबूद्री ब्राह्मण कुटुंबातून इस्लाम स्वीकारलेल्यांचे वंशज असल्याचा दावा करतात. नायर आणि इतर अनेक जातींद्वारे ही मातृलिंगाची प्रथा आली तसेच ही प्रथा केरळच्या सांस्कृतिक पद्धतीचा भाग होती,” असे ते म्हणाले.
कुरिया सांगतात, मातृत्वाची प्रथा केवळ केरळशी संबंधित नव्हती, सामान्यतः हिंद महासागर प्रदेशातील मोझांबिक, इंडोनेशिया, मलेशिया, टांझानिया इत्यादी अनेक ठिकाणच्या मुस्लिमांमध्ये आढळते, किंबहुना बेटवासीयांचा असा विश्वास आहे की त्यांची मातृत्वाची प्रथा इस्लामला धरूनच आहे. “त्यांचा असा विश्वास आहे की पैगंबर आपली पहिली पत्नी, खादीजाबरोबर मातृसत्ताक व्यवस्थेत रहात होते. त्यांच्या मातृवंशीय प्रथेसाठी ही धार्मिक मान्यता आहे,” कालिकत विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रमुख डॉ. एन पी हाफिज मोहम्मद यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. लक्षद्वीपमध्ये मातृसत्ताक समाज टिकून राहण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या बेटांची भौगोलिक विलगता, या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे केवळ वसाहतवादी प्रभाव टळला नाही तर १९३० च्या दशकात दक्षिण-पश्चिम भारतातील सुधारणावादी मुजाहिद चळवळीप्रमाणे मुस्लिम जगाच्या इतर भागांतील परंपरागत इस्लामिक विचारांच्या प्रभावाखालीही ते आले नाहीत. एकुणात काय तर लक्षद्वीपमधील संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर जगात अनोखी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi lakshadweep visit cultural history of lakshadweep how muslims of lakshadweep different from the other parts of india and world svs