महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्या व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार. आज त्यांचा वाढदिवस (१२ डिसेंबर, १९४०). महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा केला जाऊ नये, अशी सक्त ताकीद यावर्षी त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आली. भारतीय राजकारणात एक हुशार मुत्सद्दी म्हणून वावरलेल्या शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ- उतार पाहिले, अनुभवले आणि त्यातून धडाही घेतला. शरद पवार आणि राजकीय खळबळ असे एक समीकरणच आहे, असे असले तरी २००४ साली पवार यांना कर्करोगासारख्या भयंकर रोगाने गाठले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी कर्करोगाविरुद्ध सक्षमपणे लढा दिला होता आणि  त्यामागची प्रेरणा ते आपल्या आईला मानतात. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या या संघर्षाविषयी जाणून घेणे नक्कीच बोधप्रद ठरणारे आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्करोगाचे निदान झाले तेव्हा…

तो काळ २००४ सालच्या निवडणुकीचा होता… शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात चांगलेच गुंतलेले होते आणि जे घडू नये तेच घडले. याच कालखंडात कर्करोगाचे निदान झाले. कोणत्याही शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये याच सकस दृष्टिकोनातून पवारांनी याकडेही कानाडोळा केला नाही. ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. रवी बापट हे शरद पवारांसोबत नेहमी असायचे, शरद पवार यांच्या डाव्या गालाच्या आत गाठ आली आहे हे शरद पवारांकडून कळताच डॉ. बापटांनी त्यांना ब्रीच कँडी मधून बायोप्सी करून घेऊया असे सांगितले. रिपोर्ट आल्यावर कर्करोगाचे निदान झाले. पुढील उपचारासाठी डॉ. सुलतान प्रधान यांना गाठण्यात आले. त्यांनी परीक्षणानंतर ऑपरेशनचा सल्ला दिला. आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हायला सांगितले. ऑपरेशन नंतर त्यांच्या डाव्या गालाचा काही भाग काढण्यात आला. आणि त्या जागी त्यांच्या मांडीच्या त्वचेचे रोपण करण्यात आले. यानंतर किमान आठ दिवस तोंडाची कोणतीही हालचाल करायची नव्हती. टेनिस बॉलच्या मापाचा गोळा त्यांच्या तोंडात ठेवण्यात आला होता. या आठ दिवसानंतर लगेचच शरद पवार प्रचार मोहिमेत गुंतले. त्यांच्या या प्रचार मोहिमेत भरगच्च दौरेदेखील होते. या कालखंडात डॉ. बापट हे नेहमीच त्यांच्यासोबत असायचे पथ्ये सगळी पाळली जात आहेत का यावर त्यांचे काटेकोर लक्ष असायचे. 

अधिक वाचा: Balasaheb Thackeray: कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी … असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना का म्हणाले होते?

वेदनादायी उपचार 

निवडणुकीचा प्रचार संपल्यावर लगेचच केमोथेरपीचे उपचार सुरु झाले. हे उपचार अत्यंत वेदनादायी होते. तरीही पवार यांनी आपल्या रोजच्या कार्यात खंड पडू दिला नाही. उपचार कितीही वेदनादायी असले तरी ते झाल्यावर आपल्या कार्यालयीन कामकाजात गुंतून जात असतं. शरद पवार यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. यासाठी रोज रुग्णालयात जावे लागत असे, याच विषयी खुद्द शरद पवार लिहितात, “किमोथेरेपीत अत्यंत सूक्ष्म सुईनं आजूबाजूचा आतला भाग जाळला जात असे, त्यामुळे माझे ओठ आणि जीभ भाजून निघायची. साधं पाणी देखील पिताना भूल घ्यावी लागायची. तेंव्हाच पाणी गिळता यायचं. शरीराची अवस्था जेंव्हा अत्यंत नाजूक असते, तेंव्हा मानसिक ताकद तुमच्या कामी येते. या काळात पातळ आहार घ्यावा लागत होता. तोंडात चमचा घालतानाही जीवघेण्या वेदना व्हायच्या. तोंडातून रक्ताचे थेंब ठपकायचे. पूर्ण नॅपकिन रक्तानं भरायचा. माझ्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना माझ्या वेदना पाहावयाच्या नाहीत. ते मला म्हणायचे, “काही दिवस कामातून बाजूला होऊन आराम करा.” माझ्या मनाचा निग्रह मात्र पक्का होता. कामात गुंतवलं, तरच आपल्या वेदना विसरता येऊ शकतात. विश्रांती घेत बसलो, तर वेदनांचंच राज्य मनावर राहतं.” त्यानंतर शरद पवार यांनी पुढील उपचार अमेरिकेतील  न्यूयॉर्क येथे ‘स्लोन केटरिंग’ या रुग्णालयात घेतले. मूळचे मिरजेचे असलेल्या डॉ. मेहतांच्या देखरेखीखाली उपचार सुरु झाले. आणि काही वर्षांच्या उपचारानंतर परत कधीच त्याची गरज भासली नाही. 

पान पराग तंबाखू घातकच 

पवार यांनी कर्करोगाच्या कारणमीमांसे बद्दल मनोगत लिहिताना पान- तंबाखू किती घातक आहेत हेही नमूद केले आहे, “मी पान पराग खायचो. तो पूर्णपणे बंद केला. याचे परिणाम  किती  भयंकर असतात, हे मी अनुभवलेलं होतं; त्यामुळे ‘तंबाखू आणि पानपराग खाऊ नका’ असं मी आग्रहानं सांगू लागलो. याचा एक विधायक परिणाम म्हणजे आमच्या सरकारनं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. 

अधिक वाचा: हायड्रोजनेटेड तेल म्हणजे काय आणि ते सुरक्षित आहे का?

लढण्याचे संस्कार आईचे 

‘याच्यावर आपण मात करायची आहे! आपण कर्करोगाबरोबर दोन हात करायचे, जिंकायचं!’- कर्करोगाचं निदान झाल्यावर शरद पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया होती. त्यांच्यातील हा लढण्याचा गुण त्यांच्या आईकडून आला होता, असे स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात. तिच्याच संस्कारांमुळे कर्करोगासारख्या व्याधीवर मात करू शकलो, असे ते कृतज्ञतापूर्वक लिहितात. ते लिहितात, ‘कोणत्याही शारीरिक त्रासावर मात करून ती भक्कमपणे उभी राहायची. आईच्या याच गुणाचे वर्णन करताना ते एक आठवण सांगतात, आमच्या गावात एक सोडलेला वळू होता, आणि त्याचा लोकांना त्रास होतो म्हणून कुणीतरी दोन-चार गोळ्या त्याला घातल्या. गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका कोपऱ्यात पडला होता. पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या नजरेस तो पडला. त्याच्या अंगातून रक्त येत आहे, हे पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरविला. तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं पाडलं. पुढे पंधरा मिनिटं तो आईला धक्का देत होता. त्यात तिच्या एका मांडीचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यावर एका पायाचं जवळपास सहा इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली, पण त्यानंतर सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय कधीच चालू शकली नाही, एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यानंतर त्या माऊलीने दुखण्याचा कोणताही बाऊ केला नाही. आम्हा अकरा भावंडांवर असणारी तिची बारीक नजर तसूभरही कमी झाली नाही.’ 

माझ्या आईनं शारीरिक व्याधीला स्वतःवर कधीही राज्य गाजवू दिलं नाही. तिनं निर्धारानं प्रत्येक दुखण्याचा सामना केला आणि यशस्वी झाली. माझ्या इच्छाशक्तीचा जन्मच अशा संस्कारातून झाल्यामुळे कर्करोगाचं निदान मला मुळापासून हादरवू शकलं नाही…, शरद पवार सांगतात!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar marathi news how sharad pawar defeated cancer svs