नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जयंती दिवस ‘पराक्रम दिवस’म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांच्या ५७१ पैकी २१ सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्र सन्मानितांची नावे देण्यात आली. एक प्रकारे सशस्त्र दलाच्या शौर्याचा सन्मान करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र यानिमित्ताने देशाच्या अग्नेय दिशेला एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या अंदमान निकोबार बेटांची चर्चा सुरु झाली आहे.लष्करी दृष्ट्या या बेटांचे अनन्य साधारण असं महत्व आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंदमान निकोबर बेटं नक्की कशी आहेत?

पश्चिम बंगालच्या उपसागरात अग्नेय दिशेला असलेली अंदमान-निकोबार ही बेटांची एक समूह साखळी आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तरकेडली बेटांना अंदमान तर दक्षिणेकडील बेटांना निकोबार बेटं या नावाने ओळखले जाते. दोन्ही मिळून विविध आकाराची एकुण ५७२ बेटं असून यापैकी फक्त ३७ बेटांवर मानवी वस्ती आहे, उर्वरित बेटं ही निर्मनुष्य आहेत. हा सर्व भाग केंद्रशासित प्रदेश असून याची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे. काही बेटांदरम्यान बोट सेवा आहे, काही बेटांवर विमानानेच पोहचणे जास्त सोईचे आहे.

बेटांचे भौगोलिक स्थान

ही बेटं भारताच्या मुख्य भूमीपासून जरी दुर असली तरी इंडोनिशायपासून ही अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर आहेत. तर सुमारे ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर थायलंड आणि म्यानमार हे देश आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंडोनेशियाच्या मलाक्का आखात्याच्या जवळच निकोबार बेटाचे टोक किंवा भारतातील सर्वांत दुरचे टोक इंदिरा पॉईंट हे आहे.

अंदमान निकोबार बेटं का महत्त्वाची?

भारताच्या भूभागापासून सर्वात दूर असलेली बेटाचं लष्करी दृष्ट्या अनन्य साधारण असं महत्व आहे. जगात जलमार्गे जी मालवाहतूक केली जाते त्यापैकी २५ टक्के मालवाहतूक ही मलाक्का आखातामधून होते. आपला मुख्य शत्रू असलेल्या चीनची बहुतांश मालवाहतूक ही याच आखातामधून होते. त्यामुळे या भागावर नजर ठेवणे, जरब ठेवणे आणि गरज पडल्यास नियंत्रण ठेवणे हे अंदमान निकोबार बेटांमुळे शक्य होणार आहे. फक्त चीन नाही तर भारतासह जपान, सिंगापूर, व्हिएतनाम, तैवान, दक्षिण कोरिया, थायलंड, मलेशिया आणि अर्थात इंडोनेशिया हे देशही मालवाहतूकीसाठी याच आखातामधील जलमार्गाचा वापर करतात. एका अंदाजानुसार दरवर्षी एक लाखाहून अधिक विविध मालवाहू जहाजे या भागातून प्रवास करतात. मालवाहतुकीमध्ये तेलाची वाहतुक ही मोठ्या प्रमाणात होते.

थोडक्यात या भागातील जलवाहतूक नियंत्रित केली तर चीनसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो.

सैन्य दलाचे संयुक्त केंद्र – Andaman and Nicobar Command

ही बेटं भौगोलिक दृष्ट्या दूर असल्याने इथे विमानानेच वेगाने पोहचणे शक्य आहे, तसंच या बेटांच्या परिसरात दीर्घकाळ गस्त घालायची असेल तर ती नौदल किंवा तटरक्षक दलांच्या बोटींनेच शक्य आहे. तसंच वेळप्रसंगी या बेटांच्या पलिकडे असलेल्या भूभागांवर किंवा जहाजांवर लष्करी कारवाईची वेळ आली तर लष्कराची सज्ज तुकडी असणे आवश्यक आहे. म्हणूनच या बेटांसाठी २००१ ला संरक्षणालाच्या संयुक्त केंद्राची ( Andaman and Nicobar Command ) निर्मिती करण्यात आली. तेव्हा भारतापासून दूर असलेली ही बेटं, त्याचे सागरी क्षेत्र ( Exclusive economic zone ) आणि या बेटांचा परिसर यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही Andaman and Nicobar Command वर देण्यात आली आहे.

या माध्यमातून जलवाहतूकीवर लक्ष ठेवणे, चीनच्या समुद्रातील हालचालींवर नजर ठेवणे, विविध क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आणि अवकाश प्रक्षेपण यासाठी मदत करण्याचे काम या बेटांवरील सामरीक पायाभूत सुविधांमार्फत केलं जातं.तसंच या बेटांवर आणि समुद्रात असलेली नैसर्गिक संपत्तीमुळे, जैविक विविधता यामुळेही या बेटांचे महत्व अनन्यसधारण आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is military significance of andaman nicobar island asj