अनेक दिवसांपासून आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’च्या ट्रेलरची प्रतीक्षा होती. अखेर हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर बॉयकॉट सितारे जमीन पर हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक ‘लाल सिंग चड्ढा’ (२०२२)नंतर बॉलीवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान पुन्हा एकदा पडद्यावर परतला आहे. आमिर खानचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ चित्रपट लोकप्रिय ठरला होता. ‘सितारे जमीन पर’कडे त्याचाच सीक्वेल म्हणून पाहिले जात आहे.
या चित्रपटात आमिर खान एक बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत असून, त्याला दिव्यांग खेळाडूंच्या संघाला प्रशिक्षण देण्याची शिक्षा सुनावल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावरच संपूर्ण चित्रपट केंद्रित आहे. आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवर टीकाही होताना दिसत आहे; दिव्यांग लोकांवर चित्रपट तयार केल्याबद्दल काही लोक अमिर खानचे कौतुकदेखील करीत आहेत. परंतु, आमिर खान प्रॉडक्शन्सअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला ‘एक्स’वर ट्रोल का केले जात आहे? चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी का होत आहे? त्याविषयी जाणून घेऊ…
‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रदर्शित
‘सितारे जमीन पर’चा अधिकृत ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला १२ तासांच्या कालावधीत १.३ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले. या चित्रपटातील संकल्पनेमुळे ट्रेलर खूप लोकप्रिय झाला. “या चित्रपटाची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी खऱ्या लोकांना कास्ट केले आहे. कोणीही डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिस्टिक असल्याची अॅक्टिंग करीत नाहीये,” असे एका वापरकर्त्याने म्हटले.
दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “माझ्या मुलीला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्याचे निदान झाले आहे. अशा प्रकारचा चित्रपट आमच्यासारख्या पालकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी मला निवडल्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. या विषयावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल आणि जागरूकता आणल्याबद्दल आमिर सरांचे आभार. मूल दिव्यांग नसते, ते केवळ वेगळे आणि खूप खास असते.” तिसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “माझ्या मुलाला ऑटिझम स्पेक्ट्रमचे निदान झाले आहे. या ट्रेलरने मला एकाच वेळी रडवले आणि हसवले. मला आशा आहे की, या चित्रपटामुळे मुले आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्ती यांच्याबद्दल थोडी जागरूकता आणि आदर निर्माण होईल.”
चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी का होतेय?
‘सितारे जमीन पर’च्या पोस्टरवर ‘बॉयकॉट’ लिहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच #BoycottSitaareZameenPar हा हॅशटॅग ‘एक्स’वर ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, चित्रपटावर टीका करणाऱ्यांनी २०२० मध्ये तुर्कीच्या पहिल्या महिला एमीन एर्दोगान यांच्याबरोबर घेतलेल्या आमिर खानच्या भेटीचे फोटोदेखील शेअर केले. त्यावेळी आमिर खान त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या काही भागांच्या चित्रीकरणासाठी तुर्कीला गेले होते. त्यावेळीदेखील तुर्कीचे पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आमिर खानला टीकांचा सामना करावा लागला होता. गेल्या काही दिवसांत भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.
पाकिस्तानच्या समर्थनार्थ तुर्कीची भूमिका
दक्षिण काश्मीरच्या पहलगामजवळ बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २५ पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)ने स्वीकारली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई करीत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर तणाव आणखी वाढल्यावर पाकिस्तानने नागरी भागावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला, जे सर्व हल्ले भारताने परतवून लावले. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तुर्कीने जाहीरपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय नागरिकांनी तुर्कीविरोधात कडक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भारतीयांनी आता ऑनलाइन निषेध करीत तुर्की एअरलाइन्सकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तुर्की आणि अझरबैजान हे दोन मुस्लीमबहुल देशांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे आले. तुर्कीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताच्या हल्ल्यांचा निषेध केला आणि ऑपरेशन सिंदूरने सर्वव्यापी युद्धाचा धोका वाढविल्याचे भाष्य केले. तुर्कीने दोन्ही देशांना विचार करण्याचे आणि एकतर्फी कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने, “आम्हाला अपेक्षा आहे की, शक्य तितक्या लवकर या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आणि अशाच प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्याकरिता दहशतवादविरोधी क्षेत्रात आवश्यक यंत्रणा तयार केल्या जातील. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या आवाहनाला आम्हीदेखील पाठिंबा देतो,” असे म्हटले.
आमिर खानची पहलगाम हल्ल्यावरील प्रतिक्रिया
आमिर खान यानी अलीकडेच पहलगामच्या भीषण दहशतवादी हल्ल्याबद्दल आपले मौन तोडत आपली भूमिका स्पष्ट केली. देशाला न्याय हवा आहे आणि त्यांचा भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. आमिर खान म्हणाला, “आम्हाला न्याय हवा आहे आणि हे पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत.” त्यांनी पुढे म्हटले की, मला खात्री आहे की सरकार न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.