Lucknow Pitch: एकही षटकार न लगावला गेल्याने, हार्दिक पांड्याने खेळपट्टीबद्दल उपस्थित केला प्रश्न Along with Hardik Pandya fans raised questions on the Lucknow pitch as not a single six was hit in the match | Loksatta

Lucknow Pitch: एकही षटकार न लगावला गेलेल्या खेळपट्टीबद्दल हार्दिक पांड्याने उपस्थित केला प्रश्न

Hardik Pandya on Lucknow pitch: भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकही षटकार लगावला गेला नाही. तसेच चाहते आणि कर्णधार हार्दिक पांड्याने खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

IND vs NZ 2nd T20 Hardik Pandya on Lucknow pitch
हार्दिक पांड्या (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात टीम इंडियाने मोठ्या मुश्किलीने ६ गडी राखून विजय मिळवला. पण सामन्यानंतर लखनऊमधील खेळपट्टी आणि सामन्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने दोन्ही संघांचे कर्णधारही हैराण झाले होते. या टी-२० सामन्यात एकही षटकार दिसला नाही हे देखील आश्चर्यकारक होते.

लखनऊमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानेही १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपले ४ फलंदाज बाद गमावले. अशा प्रकारची खेळपट्टी भारतातील कोणत्याही टी-२० सामन्यात क्वचितच पाहायला मिळते, जिथे फलंदाज प्रत्येक धावांसाठी धडपडताना दिसतात.

सामन्यात एकही षटकार मारला गेला नाही –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यातही एक विक्रम झाला, या सामन्यात २३९ चेंडू टाकले गेले आणि एकही षटकार मारला गेला नाही. कोणत्याही टी-२० सामन्यातील अशा प्रकारची ही पाचवी मोठी घटना ठरली. यादरम्यान सामन्यात १६ फलंदाजांनी फलंदाजी केली, ज्यांनी केवळ १८३ धावा केल्या. संपूर्ण सामन्यात केवळ १४ चौकार मारले गेले.

हेही वाचा – IND vs NZ: भुवनेश्वरला मागे टाकत युझवेंद्र चहलचा नवा विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणार ठरला पहिलाच भारतीय

एकही षटकार न लागवलेले सामने –

गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १९ फलंदाज, २४३ चेंडू
गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १६ फलंदाज, २४३ चेंडू
हाँगकाँग विरुद्ध युगांडा, १९ फलंदाज, २४३ चेंडू
केनिया विरुद्ध आयर्लंड, २० फलंदाज, २४० चेंडू
भारत विरुद्ध न्यूझीलंड, १६ फलंदाज, २३९ चेंडू

खेळपट्टीबद्दल प्रश्न उपस्थित –

चाहत्यांबरोबरच कर्णधार हार्दिक पांड्यानेही लखनऊच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, ”खरे सांगायचे तर ती चकित करणारी खेळपट्टी होती. आम्ही दोन्ही सामने खेळलो आहोत, दोन्हीमध्ये असेच होते. कठीण खेळपट्टीवर खेळायला माझी हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे. पण या खेळपट्ट्या टी-२० सामन्यांसाठी नव्हत्या.”

हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: वॉशिंग्टनच्या धावबादवर सामन्यानंतर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला,’मी चेंडू …’

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ”जिथे सामने होत असतील तिथे खेळपट्टी अगोदरच तयार करावी. जेणेकरून सामन्याच्या दिवसापर्यंत खेळपट्टी तयार करता येईल आणि त्यांना वेळ मिळेल.” केवळ हार्दिक पांड्याच नाही तर इतर अनेक तज्ञ आणि चाहत्यांनीही ही खेळपट्टी टी-२० साठी योग्य नाही असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:09 IST
Next Story
IND vs NZ 2nd T20: “लखनऊची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी…!” भारताची फिरकी जोडी ‘कुलच्या’समोर ‘मिस्टर ३६०’ ची कबुली