भारतीय संघाने आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तची घोषणा केली. त्यामुळे दोघांनाही बीसीसीआयकडून फेअरवेल करण्यात देण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज आहेत. दरम्यान बीसीसीआयचा कुठलाही प्लॅन नसला तरीदेखील, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराट कोहली आणि रोहित शर्माला फेअरवेल देण्याचा प्लॅन केला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच, विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा करून बीसीसीआयला मोठा धक्का दिला. त्यामुळे या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि दोघांनी कर्णधार आणि फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे दोघांनाही फेअरवेल सामना खेळायला मिळायला हवा होता, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आयोजित करणार फेअरवेल सोहळा?

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटी आणि टी २० क्रिकेटला रामराम केलं आहे. त्यामुळे ही जोडी केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. या वर्षाच्या शेवटी, भारतीय संघ ३ वनडे आणि ५ टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा दोघांचाही शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन्ही दिग्गजांसाठी फेअरवेल सोहळा आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग म्हणाले, ” विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना ऑस्ट्रेलियात खेळताना पाहण्याची ही शेवटची संधी असू शकते. असे असेल तर आम्ही त्यांना फेअरवेल देऊ इच्छितो. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अविश्वसनीय योगदानाचे कौतुक करू इच्छितो.”