Aakash Chopra Statement on Gautam Gambhir : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने या मोठ्या पदासाठी गौतम गंभीरशी संपर्क साधल्याची बातमी अलीकडेच आली आहे. आता याचा अर्थ प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर आहे. त्याने सहमती दर्शवल्यास तो भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षकही होऊ शकतो. आता या संपूर्ण प्रकरणावर आकाश चोप्राची प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीरला मजबूत प्रतिमेचा माणूस म्हणून सांगून त्याने टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना इशारा दिला आहे.
गंभीर हा स्पष्ट आणि सरळ बोलणारा माणूस –
या संपूर्ण प्रकरणाविषयी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने सर्वप्रथम गौतम गंभीरचे कौतुक केले. बीसीसीआय जर त्याला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा विचार करत असेल तर तो योग्य निर्णय असेल, असे तो म्हणाला. तो म्हणाला की, गंभीर हा स्पष्ट आणि सरळ बोलणारा माणूस आहे. जे होईल ते तोंडावर सांगेल. संघ कसा तयार करायचा हे त्याला चांगलेच माहीत आहे. त्याला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाहणे आनंददायक ठरेल.
आकाश चोप्राचा वरिष्ठ खेळाडूंना सावध राहण्याचा सल्ला –
आकाश चोप्रा म्हणाला, “गंभीर हा वाईट पर्याय नाही, यात काही शंका नाही, कारण तो एक स्पष्टवक्ता आहे. संघ कसा तयार करायचा आणि कसा सांभाळायचा याची त्याला उत्तम जाण आहे. मला लिलावाच्या प्रकरणातील त्याची समज खूप आवडते. पण भारतीय संघाचा कोणताही लिलाव होणार नाही. गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून खूप मजबूत व्यक्तिमत्त्व आहे. पण जर संघात आधीच अनेक वरिष्ठ खेळाडू असतील, तर मी त्यांना सावध राहण्याचा सल्ला देईन. कारण गौतमची काम करण्याची पद्धत जवळजवळ कठोर वडिलांसारखी आहे. जेव्हा वडील कठोर असतात, तेव्हा मुलांनी जरा सावधगिरी बाळगली पाहिजे.”
हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1 : राहुल त्रिपाठी धावबादनंतर भावूक, पायऱ्यांवर बसून रडतानाचा VIDEO व्हायरल
कधी तुम्हाला एका मोठ्या भावासारखे वागावे लागते – आकाश चोप्रा
माजी सलामीवीर पुढे म्हणाला, “जेव्हा संघात खूप वरिष्ठ खेळाडू असतात, तेव्हा तुम्हाला एका मोठ्या भावासारखे वागावे लागते. जो खेळाडूंच्या खांद्यावर ठेवेल आणि आपली मते त्यांच्यावर लादणार नाही. गौतमच्या बाबतीत असे होणार नाही. त्याची एक खूप सोपी पद्धत आहे. जे काही होईल ते माझ्या पद्धतीनेच होईल. जेव्हा ही पद्धत अवलंबली जाते, तेव्हा प्रत्येक वेळी गोष्टी तुमच्या मार्गाने जात नाहीत. विशेषत: जेव्हा संघात वरिष्ठ खेळाडू असतात. तरुण खेळाडूंसोबत तुम्ही हे करू शकता, असे मला वाटते.”
हेही वाचा – KKR vs SRH : २४.५ कोटींचा मिचेल स्टार्क पावला; कोलकाता दिमाखात अंतिम फेरीत
मला जिंकण्याचे वेड आहे – गौतम गंभीर
गौतम गंभीरने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या स्पष्टवक्ते स्वभावाबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले की आक्रमक असणे त्याच्या स्वभावात आहे. तो म्हणाला, “मी कोणताही नियम मोडत नाही. मला शक्य तितके आक्रमक व्हायचे आहे. त्यात चुकीचे काय आहे? हा माझा स्वभाव आहे. ही माझी खासियत आहे कारण माझ्यासाठी जिंकणे ही एक आवड आहे आणि मला जिंकण्याचे वेड आहे. ही माझी समस्या आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd