WTC Final Qualification for India after IND vs BAN 1st Test Win: भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा २८० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे. भारताला येत्या काळात अजून ९ कसोटी सामने खेळायचे आहेत. पण जर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आता किती सामने जिंकावे लागतील, याचा आढावा घेऊया.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या गुणतालिकेत भारताची पकड मजबूत झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ८६ रेटिंग गुण मिळवले आहेत. ७१.६७ टक्केवारीसह टीम इंडिया आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने वेस्ट इंडिजचा १-० आणि इंग्लंडचा ४-१ अशा फरकाने कसोटी सामन्यात पराभव केला होता.
आता टीम इंडियाने बांगलादेशला २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पराभूत करून आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला सध्या बांगलादेशविरुद्ध १, न्यूझीलंडविरुद्ध ३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती. टीम इंडियाने या मोसमात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा
WTC Final: भारताला किती कसोटी सामने जिंकावे लागणार?
आयसीसीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील ९ पैकी किमान ५ सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत बांगलादेशविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर, संघाला ५ कसोटी सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-२ मध्ये असणे आवश्यक आहे. भारताने ४ सामने जिंकले आणि १ सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४ सामने जिंकावे लागतील किंवा ३ सामने जिंकावे लागतील आणि १ सामना अनिर्णित ठेवावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट संघ तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांचे ८ सामने बाकी आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडला ६ सामने जिंकावे लागतील किंवा ५ सामने जिंकून १ अनिर्णित ठेवावा लागेल.
© IE Online Media Services (P) Ltd