What is the cut-off time for IND vs SA Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे करोडो चाहते पाहत आहेत. बार्बाडोसमध्ये शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा शानदार सामना सुरू होईल. मात्र, या सामन्यात पावसाचा जोर कायम आहे. अशा परिस्थितीत जर पावसाने व्यत्यय आणला तर काय असणार ‘कटऑफ टाईम’? याबद्दल जाणून घेऊया.
रात्री ११.१० पर्यंत आहे ‘कटऑफ टाईम’ –
वृत्तानुसार, सध्या हवामान स्वच्छ आहे, परंतु ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची ६० टक्के शक्यता आहे. सामना सुरू होण्यापूर्वी सुमारे ६० मिनिटे किंवा एक तासाचा ‘बफर टाईम’ ठेवला जातो. त्यानंतर षटके कपात केली जाऊ लागतात. म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सामना सुरू झाला तर ४० षटकांचा संपूर्ण सामना पाहता येईल, परंतु त्यानंतर षटकं कपात केली जाऊ शकतात. किंवा १०-१० षटकांचा सामनाही पाहिला मिळू शकतो. सामना सुरू करण्याची शेवटची वेळ ११.१० (भारतीय वेळेनुसार १: ४०) आहे. म्हणजे या वेळेपर्यंत सामना सुरू झाला तर ठीक, नाहीतर तो राखीव दिवशी खेळवला जाईल.
दोन्ही दिवशी १९० मिनिटे अतिरिक्त वेळ –
विशेष म्हणजे सामना पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार (रिझर्व्ह डे) या दोन्ही दिवशी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी पुरेसा वेळ आहे. जरी सामना आयोजित करणे शक्य झाले नाही किंवा खराब हवामानामुळे तो रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड –
टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा राहिला आहे. या दोघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १४ आणि आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. टी-२० विश्वचषकातही भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व आहे. दोन्ही संघ ६ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने चार सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd