Graeme Swann Statement On India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान या मालिकेआधी इंग्लंडच्या माजी खेळाडूने भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका म्हणजे इंग्लंडसाठी अॅशेस मालिकेसाठीचा सराव असं म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

स्काय स्पोर्ट्सवर बोलताना ग्रॅम स्वान म्हणाला, ” भारतीय संघाविरूद्ध होणारी मालिका अतिशय महत्वाची असणार आहे.गेल्या २-३ वेळेस आमचा भारतात दारूण पराभव झाला आहे. आता आम्हाला त्यांना इंग्लंडमध्ये पराभूत करावंच लागेल. खरं सांगू तर, अॅशेसआधी भारत- इंग्लंड मालिका सराव म्हणून उत्तम पर्याय आहे. आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. भारतीय संघातील २ प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात नसणार आहेत.”

ग्रॅम स्वानच्या मते, इंग्लंडचा संघ भारतीय संघाला सहज पराभूत करू शकतो. त्याच्या मते, इंग्लंडचे गोलंदाज घरच्या मैदानावर मिळणाऱ्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतील. ही मालिका इंग्लंडचा संघ ४-१ ने किंवा ३-२ ने आपल्या नावावर करेल, असा विश्वास ग्रॅम स्वानने व्यक्त केला आहे.

भारतीय संघाविरोधात असं वव्तव्य केल्यानंतर त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. एका युजरने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की,” ग्रॅम स्वानचं बोलणं कोणी मनावर घेतं का?” तर आणखी एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “ग्रॅम स्वानने आता काहीच बोलू नये, कारण इंग्लंडने भारतीय संघाविरूद्ध शेवटची कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा अॅलिस्टर कुक खेळत होता. आता तो निवृत्त झाला आहे.”

इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडला पराभूत करणं हे भारतीय संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे. कारण या मालिकेआधीच संघातील सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गिल पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचं नेतृ्त्व करणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच कसोटी लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय संघात अनुभवाची कमतरता आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला इंग्लंडमध्ये खेळण्याचा फार अनुभव नाही. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर गेल्या १८ वर्षांपासून भारतीय संघ इंग्लंडला इंग्लंडमध्ये खेळताना पराभूत करू शकलेला नाही. २००७ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये खेळताना कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी भारतीय संघाने १-० ने बाजी मारली होती. तर गेल्यावेळी भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त केली होती. त्यामुळे यावेळी भारतीय संघ पराभवाची मालिका मोडून इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असणार आहे.