Jitesh Sharma Drop IPL Trophy Video Viral: तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल चॅम्पियन ठरला. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने ३ जून रोजी पंजाब किंग्सचा पराभव करत या स्पर्धेचा विजेता ठरला. आरसीबीचा संघ जिंकल्यानंतर सर्वांचा आनंद शिगेला पोहोचला होता. आरसीबीच्या चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात याचा आनंद साजरा केला. दरम्यान चिन्नास्वामी मैदानावरील विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान जितेश शर्माच्या हातून आयपीएल ट्रॉफी निसटली.
विराट कोहलीने मैदानावरच आनंदाश्रूंसह या विजयाचं सेलिब्रेशन केलं. पण आरसीबी संघाचा आणि चाहत्यांच्या विजयाचा आनंद फारच क्षणिक ठरला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर दुसऱ्या दिवशी चेंगराचेंगरीच मोठं धक्कादायक प्रकरण घडलं, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे चिन्नास्वामीच्या मैदानावरील विजयाचं सेलिब्रेशनही तात्काळ थांबवण्यात आलं.
आरसीबीने या विजयाचा आनंद बंगळुरूमधील चाहत्यांबरोबर करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी बंगळुरूमध्ये ओपन बस परेड होईल, याची घोषणा केली. यानंतर बंगळुरू पोलिसांनी ओपन बस परेड गर्दी आणि ट्रॅफिकच्या कारणांमुळे रद्द केली होती. पण चाहत्यांनी आरसीबीच्या संघाला पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. आरसीबी संघाने प्रथम विधान सौधा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर संघ थेट चिन्नास्वामी स्टेडियमवर जाणार होता.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ट्रॉफीसह विजयाचा आनंद साजरा करण्यात येणार होता. पण स्टेडियममध्ये जाण्यासाठी चाहत्यांनी बाहेर खूप गर्दी केली होती आणि गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने या आनंदाच्या क्षणाला गालबोट लागलं. आरसीबी संघाला बाहेर काय घडतंय याची कल्पनी नव्हती आणि स्टेडियममध्ये कार्यक्रमाला सुरूवात झाली.
सर्वप्रथम संपूर्ण संघ मैदानावरील पोडियमवर उभा होता. त्यानंतर विराट कोहलीने घोषणा केल्यानंतर आरसीबीचा विजयी कर्णधार रजत पाटीदार ट्रॉफीसह मैदानात दाखल झाला. यानंतर संघ विक्ट्री लॅप घेण्यासाठी निघाला. यादरम्यान जितेश शर्माच्या हातात ट्रॉफी होती आणि त्याने चाहत्यांसमोर ट्रॉफी उंचावली. ट्रॉफी उंचावताच ट्रॉफीचा भार तो सावरू शकला नाही आणि ट्रॉफी त्याच्या हातातून निसटली आणि मैदानावर पडली. तितक्यात इतरांनी पकडली.
जितेशच्या हातातून ट्रॉफी निसटल्याचे पाहताच सर्वच जण एकदम हसू लागले होते. संघाचा विक्ट्री लॅप सुरू असताना बाहेर घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच आरसीबीने थेट हा कार्यक्रम थांबवला. यानंतर आरसीबीचे ऑफिशियल असलेल्या ३ जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. ९ जून रोजी पुढील सुनावणी असणार आहे.