बंगळुरू, पुणे, मुंबई- तीन कसोटी, तीन विजय. न्यूझीलंडच्या संघाने भल्याभल्या संघांना जमलेलं नाही ते भारत दौऱ्यात करुन दाखवलं. भारताला भारतात चारीमुंड्या चीत करण्याचा पराक्रम न्यूझीलंडने केला. रविवारी वानखेडे मैदानावर भारतीय संघाला झटपट गुंडाळत न्यूझीलंडने अद्भुत अशा विक्रमांच्या मांदियाळीत स्थान पटकावलं. न्यूझीलंडने न भूतो न भविष्यती कामगिरीसह असंख्य वैयक्तिक आणि सांघिक विक्रम रचले. त्याचा घेतलेला आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

-भारतीय संघ मायदेशात खेळताना पहिल्यांदाच तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत चारीमुंड्या चीत झाला. याआधी मायदेशात भारतीय संघ केवळ दोनदा चारीमुंड्या चीत झाला आहे. २००० साली दक्षिण आफ्रिकेने २ सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं होतं. १९८० मध्ये इंग्लंडने एकमेव कसोटीत भारताचा पराभव केला होता. १९८३ नंतर मायदेशात सलग तीन कसोटी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

-न्यूझीलंडने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत तीन सामने जिंकण्याचा पराक्रम केला.

-एझाझ पटेलने मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर केवळ २ कसोटीत तब्बल २५ विकेट्स पटकावल्या आहेत. भारताविरुद्ध भारतात एकाच मैदानावर इतक्या विकेट्स घेण्याचा विक्रम एझाझच्या नावावर आहे.

-विदेशात एकाच मैदानावर सामन्यात १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स पटकावणारा एझाझ केवळ आठवाच खेळाडू.

-घरच्या मैदानावर खेळताना २०० किंवा त्यापेक्षा कमी लक्ष्य गाठताना भारताची कामगिरी ३० विजय आणि एक हार अशी होती. मुंबईतला पराभव भारतासाठी अशा स्वरुपाचा पहिलाच पराभव.

-कर्णधार म्हणून रोहित शर्माचा मायदेशातला पाचवा पराभव. या नकोशा यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी.

-याआधी कसोटी इतिहासात केवळ एकदा, एका सामन्यात दोन डावखुऱ्या गोलंदाजांनी डावात १० विकेट्स घेतल्या आहेत. एझाझ आणि रवींद्र जडेजा यांनी इक्बाल कासिम आणि रे ब्राईट यांच्या १९८० मधील विक्रमाची बरोबरी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand creates history with clean sweep victory agsinst india in india with this creates abundance of new records psp