Ranji Trophy Cricket Tournament कोलकाता : कर्णधार जयदेव उनाडकट (४७ धावांत २ बळी) आणि चेतन सकारियाने (५० धावांत २ बळी) दुसऱ्या डावातही बंगालला अडचणीत आणल्यामुळे सौराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात बंगालने ४ बाद १६९ अशी मजल मारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौराष्ट्राने पहिल्या डावात ४०४ धावांची मजल मारली होती. त्यानंतर उनाडकट आणि सकारियासमोर बंगालचे फलंदाज दुसऱ्या डावातही अडचणीत आले. पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी बंगालला अजून ६१ धावांची आवश्यकता आहे. खेळ थांबला तेव्हा कर्णधार मनोज तिवारी ५७ आणि शाहबाझ अहमद १३ धावांवर खेळत होता.

फलंदाजांप्रमाणे बंगालचे गोलंदाजही घरच्या मैदानावर आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. दुसऱ्या दिवस अखेरीस सौराष्ट्राने ५ बाद ३१७ अशी मजल मारली होती. तिसऱ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केल्यावर आणखी ८७ धावांची भर घालून सौराष्ट्रचा डाव ४०४ धावांवर संपुष्टात आला. अर्पित वसावडा (८१) आणि चिराग जानी (६०) हे नाबाद फलंदाज सकाळच्या सत्रात लवकर बाद झाले. पण, त्यानंतर तळातील फलंदाजांनी चिवट झुंज देताना सौराष्ट्राचे आव्हान भक्कम केले. प्रेरक मंकडने ३३, तर धर्मेद्रसिंह जडेजाने २९ धावांची खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy cricket tournament bengal vs saurashtra take firm hold on match amy