पीटीआय, क्वालालम्पूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीला मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) जेतेपदाने हुलकावणी दिली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग जोडीला चीनच्या अग्रमानांकित लिआंग वेई केंग-वँग चँग जोडीकडून ९-२१, २१-१८, २१-१७ असा पराभव पत्करावा लागला.

प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराने सन्मानित भारतीय जोडीने अंतिम सामन्यात दमदार सुरुवात करताना पहिला गेम जिंकला होता. मात्र, त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. निर्णायक गेममध्ये ११-७ अशी आघाडी घेऊनही अखेरीस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या लिआंग-वँग जोडीविरुद्ध भारतीय जोडीचा हा चौथा पराभव ठरला. भारतीय जोडीने केवळ एकदा चीनच्या जोडीला नमवले आहे. त्यांनी हा विजय कोरिया खुल्या स्पर्धेत मिळवला आहे. मात्र, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सात्त्विक-चिरागने काही चुका केल्या आणि याचा फायदा चीनच्या जोडीला मिळाला.

हेही वाचा >>>IND vs AFG 2nd T20 : विजयानंतर रोहित-विराटने घेतली शिवम दुबेची मजा, VIDEO होतोय व्हायरल

‘‘प्रशिक्षकांना आम्हाला रॅकेट वर ठेवून पायाच्या हालचाली वेगवान करण्यास सांगितले होते. प्रतिस्पर्धी जोडी मुसंडी मारणार याची कल्पना होती. अशा वेळी आम्हाला अधिक संयमी आणि शांत खेळ करण्याची आवश्यकता होती. याच क्षणी प्रतिस्पध्र्यानी सर्वोत्तम खेळ केला,’’ अशी प्रतिक्रिया चिरागने अंतिम सामन्यानंतर व्यक्त केली.

संपूर्ण सामन्यात दोन्ही जोडय़ांकडून फारसे आकर्षक स्मॅश दिसलेच नाहीत. गेममध्ये झालेल्या रॅलिजमध्ये दोन्ही जोडय़ांनी शटल उंचावून मारण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांनी शटल समातंर ठेवले होते. वेगाशी तडजोड न ठेवता दोन्ही जोडय़ांनी मोकळय़ा जागा आणि प्रतिस्पध्र्याला कोपऱ्यात पकडण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे अंतिम सामन्यात दिसून आले.

हेही वाचा >>>IND vs AFG : १४ महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या विराटबरोबर चाहत्याने केलं असं काही की…, PHOTO होतोय व्हायरल

पहिला गेम गमावल्यानंतर चीनच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केले. मात्र, यानंतर निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीला भारतीय जोडीने कमालीच्या विश्वासाने खेळ केला. चिरागचा नेटजवळचा खेळ आणि सात्त्विकचे परतीचे फटके रंग आणत होते. भारतीय जोडीने या गेमच्या मध्याला ११-७ अशी आघाडीही घेतली होती. मात्र, त्यानंतर भारतीयांकडून चुका झाल्या आणि त्यांचा फायदा घेत चीनच्या जोडीने प्रथम १२-१२ अशी बरोबरी साधली. पुढे चीनच्या जोडीने १४-१३ अशी आघाडी घेतली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र, महत्त्वाच्या लढतीत आम्ही आमच्या संयमावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. प्रतिस्पध्र्याना दडपणाखाली ठेवण्याऐवजी आम्हीच खूप दडपण घेतले. त्यामुळे आमच्याकडून चुका झाल्या. भविष्यात या पराभवाची परतफेड करायला नक्कीच आवडेल. – सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sattwik chirag lost in malaysia open badminton final sport news amy