भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘शक्तिमान’ या अश्वाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. हे निष्पाप जीवा तुझ्या आत्म्याला शांती लाभो. आम्ही, माणसांनी तुला हरवले, असे विराटने ट्विटरवर लिहलेल्या संदेशात म्हटले आहे. डेहराडूनमध्ये निषेध मोर्चाच्या वेळी भाजप आमदार गणेश जोशी यांनी केलेल्या मारहाणीत पाय गमवावा लागलेल्या ‘शक्तिमान’ या अश्वाचा काल मृत्यू झाला होता.
‘शक्तिमान’च्या वीस सहकारी घोडय़ांना कौशल्यांचे प्रशिक्षण 
‘शक्तिमान’ १४ मार्च रोजी जखमी झाल्यावर त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्याला कृत्रिम पायही बसविण्यात आला होता. मात्र, तो या दुखापतीतून पूर्ण सावरू शकला नाही, अशी माहिती डेहराडूनचे पोलीस अधीक्षक सदानंद दाते यांनी दिली आहे. तेरा वर्षीय ‘शक्तिमान’ उत्तराखंड पोलीस दलातील प्रशिक्षित अश्व होता. शक्तिमानच्या मृत्यूने धक्का बसल्याची भावना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी व्यक्त केली आहे. शक्तिमान शूर योद्धा होता आणि कर्तव्य बजावत असतानाच त्याच्यावर भ्याड हल्ला झाला. भाजप आमदार गणेश जोशी यांनी दंडुक्याने मारहाण केल्यामुळे शक्तिमानचा पाय कापावा लागला होता. कृत्रिम पाय बसविल्यावर शक्तिमानने उभा राहायला सुरुवात केली होती.