Is Mango Good For Diabetes : उन्हाळ्यासह आता आंब्याचा सिझन सुरु झाला आहे. भारतात आंबा हा फळांचा राजा मानला जातो. क्वचित कोणी असेल ज्याला हे रसाळ, गोड उन्हाळी फळ आवडत नसेल. भारतात अनेक पौराणिक कथा, लोककथांमध्ये सुद्धा या फळाचा उल्लेख वाचायला मिळतो. त्यामुळे आंबा या फळाचे चाहते भारतात फार पूर्वीपासूनचं आहेत. पण चवीला खूप गोड असणारे हे फळ मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात का असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. यामुळे मधुमेहाचे अनेक रुग्ण हल्ली डॉक्टरांनाही विचारतात की, मला मधुमेह आहे, पण मी आंबा खाऊ शकतो का? यामुळे माझ्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही ना?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवरही मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंबा खाणे फायदेशीर आहे की नाही यावर परस्परविरोधी माहिती दिसते. काही व्हिडीओ किंवा बातम्यांमध्ये आंबा या फळात नैसर्गिक साखर असते त्यामुळे त्याचे सेवन करता येऊ शकते. काही जण म्हणतात, आंब्यामुळे रक्तातील साखर अजिबात वाढत नाही. तर दुसरीकडे काहीजण तुम्हाला सांगतील की, मधुमेह असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी आंबा अजिबात चांगले नाही. परंतु खरे सत्य असे आहे की, मधुमेहाचे प्रमाण नियंत्रित असलेले लोक आंब्यासह कोणतेही फळ मर्यादीत प्रमाणात खाऊ शकतात. फळं नैसर्गिकरित्या गोड असतात, शिवाय त्यात फायबर देखील असते, ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित असेल आणि HbA1c जास्त असेल, कार्बोहायड्रेट-समृद्ध फळांचे सेवन करणे टाळावे.

आंबा पाण्यात भिजवून मगचं खा, जाणून घ्या यामागचे फायदे आणि तोटे

आंब्यामध्ये कॅलरीज आणि साखरेव्यतिरिक्त इतर पौष्टिक मूल्ये किती असतात?

165 ग्रॅम वजनाच्या आंब्यात कोणते घटक असतात?

कॅलरी: ९९ किलो कॅलरी

प्रोटीन : ०.८- १ ग्रॅम

फॅट : ०.६३ ग्रॅम

कर्बोहाइड्रेट : २४.८ ग्रॅम

फायबर : २.६४ ग्रॅम

पोटॅशियम : २७७ मिलीग्रॅम

व्हिटॅमिन सी : ६०.१ मिलीग्राम

व्हिटॅमिन ए, आरएई : ८९.१ मायक्रोग्राम (एमसीजी)

बीटा कॅरोटीन : १०६० एमसीजी

ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन : ३८ एमसीजी

फोलेट : ७१ एमसीजी

आंब्यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर आणि ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड्स सारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात.

मधुमेह असलेला व्यक्ती दररोज किती आंबे खाऊ शकतो?

मधुमेह असलेल्या लोकांना साधारणपणे दररोज सुमारे १५०-२०० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सची शिफारस केली जाते. यापैकी जास्तीत जास्त ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स फळांपासून मिळू शकते. फळांच्या एका सर्व्हिंगमध्ये १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असते. जर कमी कार्बोहायड्रेट फळ असेल (उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरी आणि पीच), तर तुम्ही मोठा भाग खाऊ शकता. आंब्याच्या बाबतीत १०० ग्रॅम फळामध्ये १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते, ज्याचा अर्थ अर्धा मध्यम आकाराचा आंबा खाणे योग्य आहे.

आंब्यात ५० ते ५५ पर्यंत मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असतो. (ग्लायसेमिक इंडेक्स हा पदार्थातील असा एक मूल्य आहे, ज्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळी किती कमी किंवा किती वेगाने वाढते हे ठरते) (ग्लायसेमिक इंडेक्स जितका जास्त असेल रक्तातील साखरेची तीव्रता वाढते) आंब्यामुळे रक्तातील साखर वाढते पण ती ब्रेड खाल्ल्यानंतर जशी अचानक आणि वेगाने वाढते तसे होत नाही. सामान्यतः, दररोज अर्धा आंबा खाणे सुरक्षित ठरु शकते, जर तुम्हाला एका दिवसात पूर्ण मध्यम आकाराचा आंबा खायचा असेल तर तुम्हाला इतर फळे खाणे टाळावे लागेल, अशावेळी तुम्ही आंब्याच्या दोन फोडचं खाता येतील. कोणत्याही परिस्थितीत शरीरातील कार्बोहायड्रेट प्रमाण जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला पोषणतज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलणे अत्यावश्यक आहे.

आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती?

मिष्टान्न म्हणून आंब्याचे सेवन करू नका, कारण तुम्ही आधीच कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स खाल्ले असतात. अशा परिस्थितीत आंबा तुमच्या सिस्टमला ओव्हरलोड करेल. सकाळी नाश्ता म्हणून तुम्ही आंबा खाऊ शकता. नाश्ता किंवा दुपारचे जेवण किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणादरम्यान आंबा खाऊ शकतात. नाश्ता म्हणून आंबा खाणे हा एक चांगला मार्ग आहे. तुमच्या नेहमीच्या स्नॅकच्या जागी अर्धा आंबा घ्या.

आंबा कोणत्या पदार्थांसोबत खाऊ शकता?

आंब्यामध्ये खनिजे आणि व्हिटॅमिन्स भरपूर असले तरी त्यात जास्त प्रोटीन नसतात. प्रोटीन्ससह आंब्याचे सेवन केल्याने चांगला नाश्ता होईल आणि साखरे सेवन करण्याचे प्रमाण देखील कमी होईल. तुम्ही दही, किंवा बदाम, अक्रोड, काजूसह आंबा खाऊ शकता.

आंब्याचे पॅकबंद केलेले पदार्थ आणि रस आरोग्यासाठी योग्य असतो का?

ताजी फळे खाणे केव्हाही फायदेशीर असते. कारण फळांच्या पॅकबंद पदार्थांमध्ये सहसा साखर मिसळलेली असते. ज्यामुळे ताज्या फळांमधून मिळणारे प्रोटीन्स आणि खनिजे यातून मिळत नाहीत. फ्रूट ज्यूस उद्योगाने वर्षानुवर्षे फळांच्या रसांना आरोग्यदायी म्हणून प्रोत्साहन दिले आहे. भारतात आजारी व्यक्तींना ताज्या फळांचा रस देण्याची परंपरा आहे. पण फळांचा रस काढल्याने फायबर आणि काही खनिजे निघून जातात यामुळे फळांमधील केवळ साखर मिळते. फायबर नसल्याने शरीर यातील साखर वेगाने शोषते. ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढते. एका ग्लास ज्यूससाठी अनेकदा तीन ते चार फळे लागतात – म्हणजे फायबरशिवाय जास्त साखर. जेव्हा कॅलरी आणि साखरेचे प्रमाण येते तेव्हा फळांचा रस हा कोल्डड्रिंगपेक्षा फारसा वेगळा नसतो. म्हणून सहसा फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला जात नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it safe for people with diabetes to eat mangoes do mangoes raise blood sugar levels sjr