बघता बघता वर्ष संपत आलं आहे आणि ‘लयपश्चिमा’चा हा शेवटचा लेख. ‘‘आता काय लिहिशील?’’ हा प्रश्न येऊन माझ्या पुढय़ात थांबला आहे! खरंच, काय लिहायचं आजच्या लेखात? निरोपाइतकं सघन काव्य क्वचितच कुठलं असेल. एका बाजूला सदरामुळे अनेकांना पाश्चात्त्य प्रसिद्ध संगीतप्रकार माहीत झाले, आवडू
पॉपचं अर्थकारण जसं सदरात उतरलं तसंच पॉपस्टार्सचं ‘सेलेब्रिटी’ आयुष्यही. कारण संगीतावर फक्त काळी पाच, पांढरी सहा, एकताल, मायनर एफ अशा भाषेत बोलणं हे त्या संगीतावरही अन्याय करणारं असतं. संगीत ही मूलत: सामाजिक घटना आहे- Music is a Social Phenomenon – हे सदराचं मुख्य सूत्र मी पहिल्याच लेखात मांडलं होतं. आणि वर्षभर उलटसुलट विचार करूनही मी माझ्या विधानाच्याच बाजूला आहे. पण अर्थात् संगीत ही घटना किती व्यापक परिमाणं असलेली आहे. तारा ब्रॅबझोन यांच्या पॉप्युलर संगीताविषयीच्या पुस्तकात त्यांनी ती फार सूत्रबद्धपणे मांडलेली आहेत. (या ताराबाईंच्या पदरात तीन पदव्या, तीन मास्टर्स पदव्या आणि संस्कृतीशास्त्राची पीएच. डी. आहे!) संगीतविषयक चर्चा कशा होऊ शकतात याची त्यांनी दिलेली यादी रोचक आहे : संगीत आणि कॉपीराइट कायदे, संगीत आणि सेन्सॉरशिप, संगीत आणि वर्णभेद, संगीतमधले गे आणि लेस्बियन्स, संगीत आणि संगणकीकरण, संगीत आणि सामाजिक चळवळ! साधी शीर्षकं वाचतानाही आपल्याला जाणवू शकतं, की संगीत ही गोष्ट अनेक उर्वरित गोष्टींना जोडली गेलेली आहे.
आता अगदी मुळात बघू या : एकेकाळी संगीत ही ‘ऐकायची’ गोष्ट होती. आता संगीत आपण ‘बघू’ शकतो (व्हिडीओ अल्बम्स, चित्रपट संगीत); संगीतावर नृत्य करू शकतो. संगीत ही गोष्ट विचारप्रवर्तकही असते. आणि काहींलेखी (म्हणजे दस्तुरखुद्द) संगीत ही लिहिण्याचीही गोष्ट असू शकते. पैकी संगीताचं दृश्यरूप हे सर्वात महत्त्वाचं. कधी कधी गाणं ठीकठाक असतं; पण व्हिडीओमधली हलती चित्रं त्या गाण्यामधल्या गाळलेल्या जागा भरून काढतात. ‘जब वी मेट’मधलं ‘आओगे जब तुम साजना’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ते गाणं मुळात सुदैवानं चांगलंच आहे; परंतु चित्रपटाच्या कथानकाच्या संदर्भात ते गाणं अशा मोक्याच्या वेळेला येतं, की करिना कपूरची असहायता कशी जिवंत होते! तिचा चेहरादेखील मग त्या गाण्याला वेगळा ‘आय्रनिकल’ (ironical) अर्थ प्राप्त करून देतो. मुळात असं आहे ना, की संगीत आणि दृश्यकला या सख्ख्या नसल्या तरी मावसबहिणी नक्कीच आहेत. त्यांचं नातं वरवरचं आहे असं म्हणता येणार नाही. ‘Songs Summon Visuality’ हे एका संगीत समीक्षकाचं विधान मला आठवतं आहे. त्यामुळे हा बदल महत्त्वाचा आहे. संगीत आणि दृश्यकला जवळ येत आहेत.
माझ्या ‘मुळारंभ’ या कादंबरीतला ओम एका टप्प्यावर म्हणतो, ‘‘..पण बदल हा असतोच. एकतर जग तुम्हाला बदलवतं, किंवा तुम्ही ताकदीचे असाल तर तुम्ही जगाला बदलवता. पण बदल मला नकोच असं म्हणायची मुभा नियतीनं दिलेली नाही.’’ संगीताच्या बाबतीतही हे तंतोतंत खरं आहे. साधाच बदल बघू या : गाणं पूर्वी मैफलीत ऐकायचे. मग ग्रामोफोनवर, रेकॉर्डस्वर. मग आला टेपरेकॉर्डर आणि कॅसेट्स. आणि नंतर गोल चकाकणाऱ्या सीडीज्. आताचं गाणं हाताळायलाही लागत नाही. ते एम.पी. थ्री रूपात असतं.. थेट अमूर्त! पण कानांपर्यंत मात्र पोचतं ते हेडफोन्सद्वारे. आता हा बदल महत्त्वाचा आहे आणि सामाजिकदृष्टय़ा खूप गंभीरही. पूर्वी घरात रेडिओ लागला की साऱ्यांच्याच कानावर गाणं पडायचं. आता आय-पॉडवरचं गाणं हे एकटय़ा-एकटय़ापुरतं, खासगी, स्वतंत्र झालेलं आहे. ज्यांच्या घरात तरुण मंडळी आहेत त्यांना माझं हे म्हणणं लगेचच कळेल. ती मंडळी आपल्या खोलीत कानात हेडफोन्सरूपी बोळे घालून नादब्रह्मात गर्क झालेली असतात आणि बाकीचं घर त्यांची वाट पाहत थांबलेलं असतं. पीटर गॉचरनं ‘Generation coming up may never own a stereo…’ (‘पुढची पिढी बहुधा कधीच स्पीकर्सवाली संगीतयंत्रणा बाळगणार नाही.’) असं म्हटलं आहे. ते खरं झालं तर जगभरच्याच संगीतश्रवणामध्ये मोठ्ठा बदल झाल्याचं दिसेल. मराठी साहित्यामध्ये लाडक्या असलेल्या अस्तित्ववादाच्या भाषेत सांगायचं तर संगीताचं ‘एलिनिएशन’ होईल! आता इथे ‘स्माइली’ टाकता येत नाही म्हणून उद्गारवाचक चिन्ह वाक्याशेवटी दिलं आहे. तोही एक बदलच आहे मोठा. शब्दांचं सकस माध्यम सोडून व्हॉट्सअॅपवरची नाना चित्रं परस्परांना पाठवताना माणसं पाहिली की शब्द जिवंत राहणार आहेत का? आणि मग शब्द-संगीतही? पण त्यावर बोलण्याआधी पुरातत्त्वशास्त्रज्ञ असलेल्या निरंजन कुलकर्णी या माझ्या वाचकमित्रानं सदराविषयी काय लिहिलं आहे ते मांडतो. तो लिहितो- ‘‘ ‘लयपश्चिमा’ची दोन सूत्रे जाणवतात. एक ‘रॉकस्टार’मधलं ‘साडा हकक एथ्थे राख’ या गाण्यामधलं अॅटिटय़ूड आणि दुसरं सूत्र स्थलांतराचं. बंडखोरी तुझ्या शब्दाशब्दांत दिसते. विषयांच्या निवडीपासून पारंपरिक मानसिकतेवर जे हल्ले तू करतोस, त्यात ती बंडखोरी दिसते.’’ मी हे एवढय़ाचसाठी मांडलं, की एक तर निरंजन कुलकर्णी अचूक निदान करतात आणि आपल्या मागच्या प्रश्नाशीही त्याचा संबंध आहे. शब्द मरतील, शब्दसंगीत मरेल, भाषा मरेल (मराठी भाषा मेल्याची हाकाटी तर गेली शंभर वर्षे तरी होते आहे.) असं मला वाटत नाही. जगभर सहज-सोपं होत चाललेलं स्थलांतर आणि बदलासाठी उत्सुक असलेली, साऱ्यांच्याच आत कमी-जास्त असलेली बंडखोरी हे दोन घटकच भाषा आणि संगीत जिवंत ठेवतील. कारण त्या दोन घटकांमुळे अनेक अर्थगर्भ अनुभव माणसांना येत आहेत. आणि साहित्य-संगीताची अनुभव मांडण्याची क्षमता असीमित आहेच! तेव्हा बदल होईल तो ‘स्वरूपा’त; मुदलात नव्हे. टी.व्ही. आले तरी रेडिओ चाललेच आहेत. किंबहुना, अनेक खासगी वाहिन्या रेडिओवर आल्या आहेत. आणि टीव्हीवर तिन्हीत्रिकाळ बातम्या दिल्या जात असतानाही तुम्ही हे वर्तमानपत्र, हे माझं छोटंसं सदर वाचताहातच की! आणि तेही वर्षभर! हा, तुमच्यातले काहीजण निवांत चहाचे घुटके घेत पेपरमधलं ‘लयपश्चिमा’ वाचतात; तर काहीजण न्यूयॉर्कच्या मेट्रोमध्ये उभ्या उभ्या ‘लोकसत्ता’च्या मोबाइल साइटवर!
आणि केवढी भरभरून दाद तुम्ही वाचक मला देत आहात! वर्षभर अनेक वाचकांनी मला दीर्घ ई-मेल्स पाठवल्या; अनेक जाणकार लेखक, संगीतकार, गायक, चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांनीही ‘लयपश्चिमा’ आवडल्याचं आवर्जून कळवलं. साऱ्यांचे मन:पूर्वक आभार! सदर संपत असलं आज, तरी आपला संवाद राजहंस प्रकाशनातर्फे येत असलेल्या माझ्या नव्या पुस्तकाद्वारे चालूच राहणार आहे. त्यामध्ये ‘लयपश्चिमा’चा पुष्कळ विस्तारलेला, दीर्घ पैस आहे.
आणि आता निरोप : खराखुरा. आणि तो नेहमीच जड असतो. दर दोन आठवडय़ांनंतर आपली होणारी भेट आपण ‘मिस’ करणार आहोत. पण ज्या सर्वव्यापी, अनुभवसन्मुख गाण्याविषयी आपण वर्षभर बोलत होतो, ते मात्र अक्षय आहे. अरुणा ढेरे यांनी फार पूर्वीच समर्थपणे म्हणून ठेवलं आहे :
‘‘ते गाणे कसले? होता नुसताच निळासा रंग
आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ..’’
सदर संपत असलं तरी गाण्यासकट आयुष्यही समजून घ्यायचा प्रारंभ जणू होतो आहे. आणि त्या आनंदात मला न दिसणाऱ्या, पण जाणवणाऱ्या तुम्हा
साऱ्यांना सहभागी करता आल्याचं समाधान आज माझ्या या लेखणीपाशी रेंगाळतं आहे!
(समाप्त)