काँग्रेसमधील सततच्या संघर्षांमुळे बहुचर्चित कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन स्वपक्षीयांना जोराचा धक्का दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे सध्या कराड दक्षिणचे नेतृत्व करीत असून, उंडाळकर व चव्हाण गटामध्ये सध्या टोकाचा संघर्ष आहे. अशातच या मतदारसंघात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद असल्याने काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागेल. तर, उंडाळकरांची व बाळासाहेबांची नेमकी भूमिका काय राहील याबाबत आत्तापासूनच चर्चा रंगू लागली आहे.
 टंचाई आढावा बैठकीचे निमित्त करून, कराडच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीबरोबरच राजकीय आखाडाही चांगलाच गाजवला. सातारा जिल्हय़ाच्या पाणीटंचाईसाठी मुख्यमंत्री निधीतून ८ कोटी रुपये देण्याचे जाहीर करताना, लोकाग्रहास्तव कराड दक्षिणमधून लढण्यास अनुकूलता दर्शवून दुष्काळाबरोबरच विधानसभा निवडणुकीचाही सामना करण्याची तयारी दर्शवली.  एकीकडे दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले हे प्रचाराचे रान उठवून आपली उमेदवारी प्रभावी ठरवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. तर, उंडाळकरांनी गावोगावी प्रचाराच्या फेऱ्यावर फेऱ्या कायम ठेवल्या आहेत.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या गटाने विकासकामे आणि गटबांधणीवर जोर देऊन आपली वैयक्तिक तयारी ताकदीची केली आहे.