अकोले : अवैध दारू व व्यवसाय रोखण्यासाठी तालुक्यातील पहिले ग्रामरक्षक दल धामणगाव आवारी गावात स्थापन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी ११२ गावांना ग्रामरक्षक दल स्थापण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार गटविकास अधिकारी अमर माने यांनी संबंधित गावात ग्रामसभा घेण्याचे पत्र काढले होते. त्याआधारे धामणगाव आवारी येथे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले. सरपंच पूनम बाळासाहेब आवारी उपसरपंच गणेश पापळ, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
उपसरपंच पापळ यांनी ग्रामरक्षक दल उपक्रम यशस्वी करण्याची हमी दिली. ग्रामसेवक श्रीमती एस. पी. आंबरे यांनी ग्रामरक्षक दलाचे नियम समजावून सांगितले. तरतुदीनुसार ११ सदस्यांची निवड करण्यात आली. तहसीलदारांनी सदस्यांना प्रभावी काम करण्याचे, गाव व्यसनमुक्त करण्याचे व गावाने दलाच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
या दलात रघुनाथ गावंडे, रामहरी आवारी, भाग्यश्री आवारी, शोभा कोल्हाळ, संदीप मोहिते, विजय मेंगाळ, संजय आवारी, सुनीता मेंगाळ, संदीप पापळ, वाळिबा आवारी, बाळासाहेब आवारी या सदस्यांची निवड करण्यात आली.