मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात ‘हे शेतकऱ्यांचं सरकार’ आहे. ७ डिसेंबरला कांद्याची निर्यातबंदी झाली. २३ दिवसांमध्ये सरकारमधील एकाही नेत्यानं केंद्राच्या नजरेला नजर भिडवून शेतकऱ्याच्या कांद्याची नासाडी करताय का? हा सवाल उपस्थित केला नाही. म्हणून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढावा लागला, असं खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा आज ( ३० डिसेंबर ) चौथा दिवस आहे. त्यानिमित्त पुण्यात सांगता सभा पार पडली. तेव्हा अमोल कोल्हेंनी शिंदे सरकारवर चौफेर टीका केली. “मंत्रीमंडळ विस्तार करायचा असतो, पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण होतो, तेव्हा घाईत दिल्लीचं विमान पकडलं जातं. मग, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीची वाट का दिसत नाही?” असा सवाल अमोल कोल्हेंनी शिंदे सरकारला विचारला आहे.
हेही वाचा : “आमच्या पाडा पाडीत पडाल, तर…”, कोल्हेंना दिलेल्या ‘त्या’ आव्हानावरून राऊतांचा अजित पवारांना इशारा
“लाचारीनं पायाकडे पाहायला मान झुकवली, तर…”
“अफझलखानाने तुळजाभवनीच्या मंदिरावर आक्रमण केलं होतं. त्यावेळी अफझलखानाच्या सैन्यात मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, नाईकजी पांढरे असे सरदार होते. अफझलखानाने तुळजाभवनीच्या मंदिरावर आक्रमण केल्यानंतर प्रत्येक सरदाराचं रक्त सळसळलं असेल. पण, कुणालाच काहीच करता आलं नाही. कारण, मांडलिकाची झूल पांघरली होती. हीच अवस्था महाराष्ट्रातील सत्तेत बसलेल्या नेत्यांची झालीय का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लाचारीनं पायाकडे पाहायला मान झुकवली, तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.”
हेही वाचा : “Wait And Watch! अजित पवारांशी…”, ‘त्या’ टीकेनंतर अमोल मिटकरींचा अमोल कोल्हेंना इशारा
“…तर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अतुर आहोत”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसंकल्प’ अभिनायाची सुरूवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होत आहे. त्यांचं शिरूर मतदारसंघात स्वागत करतो. पण, येताना कांद्याची निर्यात बंदी रद्द, बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेस लाईट आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रूपयांचं अनुदान मिळेल, याचा जीआर घेऊन पाऊल टाकले, तर नक्कीच तुमच्या स्वागतासाठी अतुर आहोत. अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश कानठाळ्या बसवल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.