लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीच्या दिवशीच पोलिस नाईकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास बंजारा कॉलनीतील बहादूरपुरा येथे उघडकीस आली.

उमाकांत पद्माकर पाटील (५२, रा. बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, खोकडपु‍रा) असे मृत पोलीस नाईकाचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील मुळ रहिवासी होते. तसेच ते सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांचा एक मुलगा दिल्लीला कंपनीत नोकरीला आहे. तर मुलीचा विवाह झालेला आहे. वाहतूक शाखेत कार्यरत असताना काही वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्याच गुन्ह्याची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी याप्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता होती.

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर ते झोपी गेले होते. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या पत्नी झोपेतून उठल्या. तेव्हा उमाकांत पाटील हे खोलीत दिसत नसल्याने त्यांना पत्नीने आवाज दिला. पण ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्या दरवाजा उघडून बाहेर आल्या. तेव्हा पाटील यांनी जिन्याखाली गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पत्नीने आरडा-ओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. त्यानंतर पाटील यांना तात्काळ घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद क्रांती चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.