लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारूण पराभव झाला आहे. २३ जागांवरून थेट अवघ्या ९ जागांवर आल्याने भाजपाकडून आत्मपरिक्षण केलं जातंय. तसंच, या पराभवाचं खापर अजित पवारांवरही फोडलं जातंय. आरएसएसच्या ऑर्गनायजर या वृत्तपत्रातील एका लेखातून थेट अजित पवारांवर खापर फोडण्यात आलंय. त्यामुळे भाजपाकडून अजित पवारांना आता डावलण्याचा किंवा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर आणि महायुतीवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांचा आरोप, “भाजपाकडून अजित पवारांना बळीचा बकरा..”

“परंतु मुळात भाजपाचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवाविरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजपा नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपाला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी”, अशीही टीका रोहित पवारांनी केली.

जितेंद्र आव्हाडांनीही केली होती टीका

“भाजपाकडून अजित पवारांचा बळीचा बकरा केला जातो आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली याला काय अजित पवार जबाबदार आहेत? याचं उत्तर भाजपाने द्यायला पाहिजे. भाजपाची मतं कमी झाली आहेत. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर टीव्हीवर, चॅनल्सवरुन बोलणारे लोक कुठे गेले? हे लोक ऑर्गनायझरवर का बोलत नाहीत? इकडून तिकडे उड्या मारणारे लोक काय बोलणार?” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीका केली. द ऑर्गनायझर मध्ये अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं होतं. भाजपाने अजित पवारांना बरोबर घ्यायला नको होतं या आशयाचा लेख लिहिण्यात आला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps defeat is not only because of ajit dada but rohit pawars statement in discussion sgk