करोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे मदतनिधी जाहीर का करत नाही अशी विचारणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असताना सरकारडून त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे असं मत नितेश राणे यांनी नोंदवलं आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत आपलं मत सांगितलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे. भावनिक भाषण करत असताना लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे”.
Y isn’t the Maharashtra State Gov declaring relief packages like the other state guvs??
Big economic damages at every level which needs help frm the state guv.. while doing all the emotional talk people also need helping hand..
Shutdown along with a relief package is needed!— nitesh rane (@NiteshNRane) March 22, 2020
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना तळहातावर पोट असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना किमान वेतन चालू ठेवा अशी विनंती केली आहे. “अमेरिकेतल्या ट्रम्प यांच्यापासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण माणुसकी बाळगा. तळहातावर पोट असेल त्यांना मला सांगायचं आहे की, या संकटाने कोणालाही सोडलेलं नाही. आपणच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहात. त्यांना जपणं सगळ्यांचं काम आहे. किमान वेतन चालू ठेवावे अशी विनंती आहे,” असं उद्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा- “ट्रम्पपासून सरपंचापर्यंत कोणालाही या करोनानं सोडलं नाही…”
दरम्यान याआधी नितेश राणे यांनी ट्विट करत मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणात येऊ नका असं आवाहन केलं होतं. “एक नम्र विनंती….सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे. कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे!. ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.