राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने ठाकरे सरकारने निर्बंध लावले आहेत. मात्र अद्यापही सर्वसामान्यांकडून नियमांचं पालन होत नसल्याने हे निर्बंध अजून कठोर केले जातील असा इशाराही देण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावले असून महाराष्ट्रातही ती वेळ येण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळल़े त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़ मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े. दरम्यान राज्याचे गृहमंत्री यांनी वेळ पडली तर राज्यात लॉकडाउन लागू शकतो असा इशारा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूर्त रात्रीची जमावबंदी; उपाहारगृहे, सभा-समारंभ, विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर निर्बंध

“तज्ज्ञांच्या अंदाजानुसार करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून तसं दिसतही आहे. त्यामुळे सरकारने जरी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करायचं असेल तरी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येकाने आपला आनंद, उत्साह घरात राहूनच साजरा करावा. सार्वजनिक ठिकाणी येणं टाळावं आणि करोनाच्या वाढीला हातभार लावू नये. प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे,” असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं.

Covid: डबलिंग रेट वाढल्याने राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती, म्हणाले “गती जर अशीच वाढत गेली तर…”

दरम्यान अजूनही काही ठिकाणी गर्दी होत असून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर निर्बंध लागू शकतात का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “सरकारने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्यांचं पालन झालं नाही आणि उद्या करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर लॉकडाउनपर्यंत जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या मनात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, पण परिस्थितीप्रमाणे निर्णय़ घ्यावा लागेल”.

“३१ डिसेंबरच्या सर्व मोठ्या पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. यासंबधी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचं पालन झालं पाहिजे,” असं आवाहन यावेळी त्यांनी केली. तसंच लग्नातील राजकीय नेत्यांच्या गर्दीवर बोलताना त्यांनी मोठे नेते, सामान्य व्यक्ती सर्वांनीच करोनाच्या नियमाचं पालन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

आणखी कठोर निर्बंधांचे संकेत

राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याने आणखी कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या वेगाने होत असलेली करोना रुग्णवाढ चिंतेची आहे. त्यामुळे ती रोखण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करायच्या, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा कृती गट व इतरांशी चर्चा झाल्यावर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. निर्बंधांबाबत आज, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णयाची शक्यता आहे.

नववर्ष स्वागतयात्रासांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी

करोना रुग्णवाढीमुळे नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी मिरवणुका, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना तसेच फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सध्या राज्यातील निर्बंध शिथिल असल्याने नववर्षांच्या स्वागतासाठी आतापासूनच पर्यटनस्थळी गर्दी वाढली आह़े  मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे गृह विभागाने नववर्ष स्वागतासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत़़ त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच या निर्बंधात आणखी वाढ करण्याचे संकेतही दिले आहेत. सरकारने नववर्षांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 omicron maharashtra home minister dilip walse patil on lockdown sgy