Cyclone Tauktae Live News, Mumbai Weather Forecast Today : कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तौते चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकू लागलं आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून १२० किमी अंतरावर समुद्रात असून, याचा प्रचंड फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गनंतर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये वादळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या भागांतून तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.
केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी १५ किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
Highlights
अरबी समुद्रात घोंगावणारे तौते वादळाचा रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला. वादळामुळे चौघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जवळपास पाच हजार घरांची पडझड झाली. तर फळबागांना पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला. किनारपट्टीवरील चारही तालुक्यातील वीज पुरवठा वादळामुळे खंडीत झाला आहे.
महाराष्ट्रातील किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई विमानतळी रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. तसेच लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.
कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार आगामी २४ तासांत मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच, ताशी कमाल १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवली गेली आहे.
तोत्के चक्रीवादळामुळे एकूण सहा मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
पालघर व बोईसर दरम्यान असलेल्या उमरोळी स्थानकाच्या परिसरात रेल्वेला विद्युत पुरवठा करणारी ओव्हर हेड वायर तुटली आहे. त्यामुळे गाड्या सायंकाळी सहा वाजल्यापासून पश्चिम रेल्वेच्या दोन्ही बाजूवरील वाहतूक बंद आहेत.
पालघर जिल्ह्यात दुपारपासून सुमारे सहा ते सात तास मुसळधार पावसामुळे किमान २० घरांची पडझड झाली असली तरी जीवितहानी झाली नाही. दोन लाखाहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मुंबईत तीन कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे, तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली आहे.
चक्रीवादळ रात्री ८ ते ११ दरम्यान गुजरातच्या किनाऱ्यावर धडकेलं असा अंदाज आहे. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात आहेत. तर संपूर्ण राज्यात १२ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई विमानतळी रात्री ८ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. तसेच लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.
साताऱ्याला 'तोक्ते' चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. गेले दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि पावसाने सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने साताऱ्यात सोमवारी सरासरी २२.५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.रात्रभर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महाबळेश्वर पाचगणी वाई परिसरालाही या चक्रीवादळाचा फटका बसला.
तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
गोव्यानंतर रविवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाने पाऊल ठेवलं. रात्रीपासून अद्याप चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून संथ गतीने गुजरातच्या दिशेनं जात आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि राज्याच्या इतर भागात पडझड झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेतली.
मुंबईपासून १२० किमी अंतरावर अरबी समु्द्रात घोंगावणारं आणि हळहळू पुढे सरकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह राज्यातील इतर भागातही वादळाचा प्रभाव जाणवत आहे. सध्या मुंबईपासून हे वादळ पुढे सरकत असून, पुढे वादळाची वाट कशी असणार आहे. हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा...
अतिरौद्रवतार धारण केलेल्या तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. सकाळी चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास १७० किमी अंतरावर होते. सध्या १२० किमी अंतरावर चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरून सुरू असलेली हवाई वाहतूकही सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद करण्यात आली असून, वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली आहे.
Cyclone Storm Tauktae Live Tracking, Heavy Rains in Mumbai Live News : भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी हवामानाची अद्ययावत माहिती दिली आहे. पुढील काही मुंबईसह परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत आगामी काही तासांत ताशी १२० वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिला आहे.
अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
चक्रीवादळामुळे मुंबईकरांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर मुंबईच्या काही सखल भागात पाणी जमा झालं आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मोनो रेलची सेवा थांबवण्यात आली असून मुंबईतील वांद्रे- वरळी सी-लिंक हा सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सोमवारी सकाळपासून मुंबई एअरपोर्टवरील विमान वाहतूकसुद्धा संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
तौते चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला आहे. मुंबईत सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ११ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली आहे. सुरूवातील तीन तासांसाठी म्हणजेच दुपारी दोन वाजेपर्यंत हवाई वाहतूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, वादळाची तीव्रता कायम असल्याने विमानतळावरून होणारी वाहतूक दुपारी ४ वाजेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाड सबवे मार्गावर पाणी साचलं असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करून याची माहिती दिली असून, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
चक्रीवादळाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई विमानतळापाठापाठोपाठ सुरत विमानतळ प्रशासनानेही हवाई वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौते चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय आहे.
चक्रीवादळ सध्या मुंबईपासून १४३ किमी अंतर असून, संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. मात्र, सध्या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाण्यात तुफान पाऊस कोसळत आहे.
चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस सुरू असून, मुंबई वेध शाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी पुढील २४ तासांतील हवामान विषयक माहिती दिली आहे. मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर रायगडमध्ये रेड अलर्ट आहे. आज संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये ताशी ९० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. उद्या वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी असा राहिल, तर हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरलाही वादळाचा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरची पत्रे पडली असून, बरंच नुकसान झालं आहे.
रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सानपाडा पाम बीच रोडवर विजेचा खांब पडून तरूणाचा जागीच मृत्यू झाला. विशाल नरळकर हा तरूण रात्री १० वाजता कामावरून ऐरोलीला जात होता. सानपाडा येथून निघाल्यावर पाम बीचवरून दुचाकीने जात असताना विजेचा खांब अचानक त्यांच्या डोक्यात पडला. यात विशाल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशेनं जात असलेलं तौते चक्रीवादळ मुंबईपासून १५० किमी अंतरावर आहे. मागील सहा तासांपासून हे वादळ ताशी १५ किमी वेगाने पुढे सरकत असून, गुजरात आणि राजस्थानला रेड अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ही ताजी माहिती दिली आहे.
रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उरण शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहरात असलेल्या बाजारपेठे भिंत कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर भाजी विक्रेता महिला जखमी झाली आहे.
तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
तौते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रतितास ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून, जिल्ह्यांमधील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रतितास ७५ ते ८५ किमी वेगाने वारे वाहणार असून, वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून, मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून होणारी वाहतूक पुढील तीन तासांसाठी थांबवण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
सध्या चक्रीवादळ मुंबईपासून १६० किमी अंतरावर आहे. तर दीवपासून ८४० किमी अंतरावर आहे. चक्रीवादळाने अतिरौद्र रुप धारण केल्यानं मुंबईत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढणार असून, ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी १७० ते १८० इतका राहणार आहे.