महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या राजू केंद्रे यांची दखल जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या सामाजिक श्रेत्रामधील उद्यमशीलता या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत राजू यांची निवड झाली आहे.
२८ वर्षीय राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशीपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहे. भटक्या समाजातील आणि शेतकरी पुत्राला अशा यादीत कदाचित पहिल्यांदाच हा मान मिळत असल्याची भावना त्यांच्या गावामध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या गावामध्ये अभिनंदनाचे बॅनर लागलेत.
लहानश्या गावात जन्म…
राजू यांचा जन्म महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातील कुटुंबामध्ये झाला. राजू यांच्या आई-वडिलांनी आपलं प्राथमिक शिक्षणही पूर्ण केलेलं नाहीय. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे, असं त्यांचे पालक सांगतात.
अनेक अडचणी आणि पुणे सोडलं…
राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढे जिल्हाधिकारी व्हावं म्हणून पदवीच्या शिक्षणासाठी पुण्याला गेल्यानंतर राजू यांना कोणीही मार्गदर्शक नसल्याने खूप प्रयत्न करुनही हॉस्टेलला राहण्याची जागा मिळाली नाही. फर्ग्युसन सारख्या कॉलेजची तारीख निघून गेली होती. त्यानंतर पुण्यात टिकून राहण्यासाठी राजू यांनी बीपीओवगैरे काम करायचा प्रयत्न केला पण तिथेही वैदर्भीय भाषेचा टिकाव लागला नाही. अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावं लागलं.
कामाला दिशा मिळाली…
पुणे विद्यापीठातील प्रवेश राजू यांना योग्य मदत न मिळाल्याने मुक्त विद्यापीठाअंतर्गत करावा लागला. आजही क्षमता असतानाही या व्यवस्था व परिस्थितीसमोर मुकणारे असे भरपूर विद्यार्थी आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात दिसतात. म्हणूनच त्यांच्यासाठी काम करण्याचं राजू यांनी ठरवलं. वयाच्या अवघ्या विशीत राजू यांनी संघर्षाचं प्रतीक असणारं ‘एकलव्य’ नाव घेऊन एक प्लॅटफॉर्म तयार केला. पुढच्या पिढीच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हायला हव्यात आणि जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या, बहुजन समाजातील मुलं कशी घेऊन शकतील हाच दिशेने राजू यांनी काम करण्यास सुरुवात केली.
…अन् जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न सोडलं
२०१२ ला मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम राजू यांनी केले. जिल्हाधिकारी होऊन भविष्यात सामाजिक बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहत असताना तो आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचे. त्यामुळेच शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजू यांनी ठरवले आणि अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न नैसर्गिकरित्याच गळून पडले.
राजकारणात प्रयत्न केला पण…
टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना राजू यांनी ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्याद्वारे त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि ज्ञान मिळत होते. २०१५ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरवले. आपल्या गावाचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर बनवला आणि तो गावकऱ्यांना दिला. पण प्रस्थापित राजकीय समाजाने त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला. बरेच अडथळे होते पण त्यातूनही राजू शिकत राहिजे.
३० हजारहून अधिक पुस्तकं वाटली…
राजू यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिपमध्येही काम केलेले आहे, त्या काळात त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.
आई-वडील म्हणतात…
गरीबाच्या मुलांनी शिकून राजूप्रमाणे जगभरात नाव कमावावं असं त्यांचे वडील आत्माराम केंद्रे यांनी म्हटलं आहे. तर आम्हाला राजूच्या कार्याचा फार अभिमान वाटतो असं मत त्यांची आई जिजाबाई केंद्रेंनी व्यक्त केलंय.