सांगली : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तलावात पडल्याने नणंद-भावजयीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी घडली.

निशा दिगंबर आढगळे (वय २०) आणि मयूरी हणमंत आढगळे (वय १७, मूळ रा. चिंचणी जि. सातारा, सध्या रा. घानवड, ता. खानापूर) या दोघी पाय धुण्यासाठी हिंगणगादे (ता. खानापूर) येथील तलावात रविवारी दुपारी चार वाजता उतरल्या होत्या. दरम्यान, त्यांनी मोबाइलमध्ये सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात दोघींचा तोल गेला. पोहता येत नसल्याने त्या बुडाल्या. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात दोघींच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.