पंढरपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी तसेच नद्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास ७९२ गावांना फटका बसला असून, त्यातील ४० गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या ४० गावांतील हजारो लोकांना निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तरी या ४० बाधित गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी अत्यंत जबाबदारी पूर्वक काम करावे. टँकरद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य शिबिरांचे आयोजन करा, अशा सूचना संबंधित विभागाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत.
सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, सध्या बाधित गावातील नागरिक निवारा केंद्रामध्ये राहत आहेत. परंतु, आत्ता गावातील पुराचे पाणी कमी होत असून, सर्व स्थानिक प्रशासनाने तसेच जिल्हास्तरीय प्रशासनाने बाधित असलेले सर्व ४० गावांचे व तेथील नागरिकांचे जनजीवन सुरळीत होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व तातडीच्या उपायोजना राबवाव्यात. आरोग्य विभागाने सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. पाणीपुरवठा विभागाने त्या गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करावा. तसेच संपूर्ण पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी. सर्व ग्रामस्तरीय संबंधित विभागांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम गावाची स्वच्छता करून घ्यावी. व साथीच्या रोगाचा प्रसार होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरून मागवण्यात आलेल्या एकूण दहा बचाव पथकामार्फत पूर कालावधीत ४ हजार ३५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढून निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले. तर ७६ निवारा केंद्रामधून स्थलांतरित केलेल्या या सर्व नागरिकांना प्रशासनाने जेवण, पाणी, आरोग्य सुविधा व अन्य अनुषंगिक बाबी उपलब्ध करून द्याव्यात. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिले. तसेच प्रशासनाने अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये खूप चांगले काम केलेले असून, या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच बाधित गावातील जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना गोरे यांनी दिल्या. तसेच अनेक दानशूर व्यक्ती संस्था यांच्याकडून पूर बाधित नागरिकांसाठी प्रशासनाकडे मदत येत आहे. ती आलेली मदत बाधित नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाने अत्यंत चोखपणे पार पाडावी, अशाही त्यांनी सूचना दिल्या.