रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली आहे. रत्नागिरीतील गोळप पावस तर राजापुर शहर व परिसरात   पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या चोविस तासात जिल्ह्यातील राजापुर व रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्याकडून  रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट  जारी करण्यात आले आहे. गुरुवार पासून झालेल्या मुसळधार  पावसामुळे रत्नागिरी  तालुक्यात ठिकठिकाणी पाणी भरले. पावस बाजारपेठ येथे पाणी भरले. पावसामुळे गोळप मानेवाडी येथे घरावर  डोंगर कोसळण्याचा प्रकार घडल्याने या भागातील ८ घरातील लोकांना स्थलांतरीत होण्याचे आदेश महसूल प्रशासनाकडून  देण्यात आले.  डोंगर कोसल्यामुळे काही मोटारसायकल मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या. मात्र  सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

 पावस बाजारपेठेत  लोकांच्या घरात  पाणी  भरल्याने  लोक जीव मुठीत घेऊन घरात बसल्याचे भयानक चित्र दिसत होते. पावस येथील संतोष सुर्वे यांच्या घरातही पाणी  शिरले.रत्नागिरी मध्ये शुक्रवार पासून  मुसळधार  पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्या झाडे व दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.  वादळी पावसामुळे मावळंगे येथील थुळवाडीतील  संदेश थुळ यांच्या घरावर शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान वाऱ्यामुळे नारळाचे झाड  कोसळल्याची घटना घडली.

रत्नागिरी बरोबर राजापुर तालुक्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले.  पडलेल्या  पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला चांगलाच फतका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने शहरातील पिकअप शेड  पर्यत धडक मारली.  तर या वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील आडिवरे येथील प्रसिध्द श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले.

तब्बल ३५ वर्षांनंतर या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाली. तर भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वहाळावरील पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला.  तर राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली. शुक्रवारी जिल्हात पावसाची सर्वाधिक नोंद राजापूर व रत्नागिरी तालुक्यात करण्यात आली आहे.  या पावसात रस्ते, पुल यांची पुरती दुरावस्था झाली असून काही भागात विजपुरवठाही खंडीत झाला.

जिल्ह्यात पडणा-या मुसळधार  पावसामुळे प्रशासकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली असून  नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४८४.१८  मिमी तर  सरासरी पाऊस  ५३.७९ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.  मंडणगड तालुक्यात ३१.७५ मिमी, खेड मध्ये ४८.५७ मिमी, दापोलीत ४७.५७ मिमी, चिपळूण मध्ये २५.५६ मिमी, गुहागरात  २२.८० मिमी,  संगमेश्वरमध्ये  ५१.९१ मिमी, रत्नागिरीत ७७.५५ मिमी,  लांजा येथे  ५८.६० मिमी, राजापूर मध्ये ११९.८९ मि मि. पावसाची नोंद करण्यात आली आहे.