मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरकसपणे भूमिका मांडणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन इथून पुढे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. सर्व पक्षीयांचा अनुभव घेऊन आता संभाजीराजे छत्रपती यांनी स्वबळ अजमावण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवायची नाही अशी त्यांची भूमिका आहे. या पार्श्वभूमवीर त्यांनी केलेल्या ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेच्या स्थापनेवरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याच संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारण्यात यावे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समर्थकांना संघटनेसाठी कल्पक असे बोधचिन्ह पाठवण्यास सांगितले आहे.

“स्वराज्य चे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारावे… विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे, अशी आमची इच्छा आहे. हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी, कल्पक मंडळींना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर वरती पाठवून द्यावे. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल,” असे संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच बोधचिन्हाबाबत संभाजीराजेंनी काही सूचनाही केल्या आहेत.

• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.

• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.

• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.

• एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.

• जास्तीतजास्त सोमवार, दि. २० जून पर्यंत बोधचिन्ह पाठवून सहकार्य करावे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी बोलताना हा आपल्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असल्याचं सांगतानाच निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. “माझ्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असेल स्वराज्य संघटित करणं. आपली ताकद तिथे संघटित व्हायला हवी. मी सांगू इच्छितो की ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये. माझी त्यासाठी तयारी देखील आहे. पण पहिल्या टप्प्यात आपण संघटित होणं गरजेचं आहे. स्वराज्य संघटित होण्यासाठी मे महिन्यातच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे”, असं संभाजीराजे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important announcement made by sambhaji raje chhatrapati regarding swarajya sanghatana abn