अलिबाग : अलिबाग आणि आक्षी- साखर दरम्यान असलेल्या खाडीतून होणारी मोठ्या जहाजांची वाहतूक रोखा अशी मागणी अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या वतीने मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे. उसर येथील गेल कंपनीच्या उभारणीसाठी महाकाय यंत्रसामुग्रीची वाहतुक खाडीमार्गाने केली जात आहे. ज्यामुळे मच्छीमांरांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या बोटींचा वावर थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीच्या पॉलीमर प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणारी मोठी यंत्र समुग्री ही सागरी मार्गाने आणली जाते आहे. या मालवाहतुकीसाठी अलिबाग जवळील साखर खाडीचा वापर केला जातो आहे. ही खाडी मुळातच अरुंद आहे. अलिबाग आणि साखर अशो दोन मासेमारी बंदर खाडीच्या तोंडावर वसलेली आहे. त्यामुळे खाडीचा प्रामुख्याने वापर हा मासेमारी बोटींच्या वाहतुकीसाठी केला जात असतो. कुरूळ येथील बार्ज कंपनीतील लहान व मध्यम आकाराचे बार्ज क्वचित ये-जा करत असतात. पण गेल्या काही महिन्यांपासून या खाडीतून भल्या मोठ्या मालवाहू जहाजांची वाहतूक अचानक सुरू झाली आहे. ज्यामुळे मच्छीमार धास्तावले आहेत.

हेही वाचा : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, अंतरिम स्थगितीब…

अरुंद खाडीतून येणाऱ्या जाणाऱ्या मालवाहू जहाजांमुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. महाकाय जहाजे खाडीतून येतांना जातांना किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमांरांच्या जाळ्यांचे नुकसान करतात. बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी लावलेले निशाण उखडून टाकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी बंदरात परतणाऱ्या बोटींची मोठी गैरसोय होते. खाडीचे मुख हे अरुंद असल्याने चॅनलमध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीत जाणाऱ्या येणाऱ्या मालवाहू जहाजांची वाहतूक रोखा अशी मागणी अलिबागच्या मच्छीमार सोसायटीने केली आहे. मेरीटाईम बोर्डाने यात हस्तक्षेप करावा. मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी, आणि मोठ्या बोटी येणार असतील तर त्याची पूर्व कल्पना स्थानिक मच्छीमारांना द्यावी, ज्यामुळे त्यांना योग्य खबरदारी घेता येऊ शकेल अशी मागणी अलिबाग मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विशाल बना यांनी केली आहे.

हेही वाचा : Petrol Diesel Price Today: मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? जाणून घ्या

अलिबाग येथील खाडी अरूंद आहे. तिथून मोठ्या जहाजांची वाहतुक धोकादायक ठरू शकते. अलिबाग आणि साखर दोन्ही बाजूच्या मच्छिमारांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन खाडीतून होणारी मोठ्या जहाजांची वाहतूक तातडीने थांबवावी.

विशाल बना (अध्यक्ष , अलिबाग मच्छीमार सोसायटी)

मोठी जहाजे खाडीत येतांना योग्य खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांचे जाळे तुटून मोठं नुकसान होते. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही.

जितेंद्र पेरेकर, स्थानिक मच्छीमार…
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag fishermen s organizations demand stop the traffic of big ships in alibag bay css