कराड : वेधशाळेचा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज, जोरदार पावसामुळे तुलनेत अधिकचा जलसाठा, सिंचनासाठी घटलेली पाण्याची मागणी अशा समाधानकारक स्थितीत कोयना धरणाच्या जलवर्षावास आज रविवारी एक जूनपासून प्रारंभ झाला.

कोयना शिवसागरात २३.१२ अब्ज घनफूट (टीएमसी), धरण क्षमतेच्या जवळपास २२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा २०.९७ अब्ज घनफूट म्हणजेच १९.९२ टक्के राहिला होता. एक जून २०२४ पासून काल शनिवारी ३१ मे अखेर कोयना शिवसागरातून एकूण १८१.७५ अब्ज घनफूट पाणी वापर झाला आहे. कोयना पाणलोटात या वर्षी नवजाला सर्वाधिक ६,८६२ मिलीमीटर. खालोखाल महाबळेश्वरला ६,६४७ तर, कोयनानगरला ५,७८८ मिलीमीटर असा सरासरी ६,४३२.३३ मिलीमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या १२८.६५ टक्के पावसाची नोंद झाली.

या आधीच्या एक जून २०२३ ते ३१ मे २०२४ वर्षात नवजाला ५,६४२, महाबळेश्वरला ५,४५१ तर, कोयनानगरला ४,०६० मिलीमीटर असा सरासरी ५,०५१ मिलीमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झाला होता.

सध्या पावसाने पश्चिम घाटात आणि विशेषतः दुष्काळी प्रदेशात जोरदार कोसळत पाण्याचा सुकाळ पसरवला आहे. त्यातून जलाशये वधारली असून, हा पाऊस शेतीसाठी काहीसा नुकसानकारक ठरला असला तरी पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासादायक ठरला आहे. अशातच कोयनेसह अन्य धरणसाठे चांगल्या स्थितीत असल्याची बाब समाधानाची असल्याचे मानले जात आहे.