आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट टाकून भाष्य केले आहे. दोनच दिवसांपूर्वी श्रीराम यांच्या आहाराबाबत जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली होती. रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना सुनावले होते. तर दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी रोहित पवार यांना मी महत्त्व देत नाही, असे म्हटले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> “रोहित पवारांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत; पक्षीय राजकारणावरून तर्क-वितर्कांना उधाण!

आपलेच “घरभेदी” सहकारी…

त्यानंतर आज रोहित पवार अडचणीत सापडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका एक्स या सोशल मीडिया साईटवरून व्यक्त केली आहे. ते म्हणाले, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला होत स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आणि भाजपाशी हातमिळवणी केली. तेव्हापासून दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. रोहित पवार यांनी सरकार आणि अजित पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेत मध्यंतरी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या यात्रेची खिल्ली उडवली होती. जितेंद्र आव्हाड यांनी “घरभेदी” असा आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केल्यामुळे पक्षफुटीकडे आणि पवार कुटुंबातील कलहाकडे ते बोट दाखवत असल्याबाबतचा तर्क लढविला जात आहे.

रोहित पवारांचा आव्हाड यांना खोचक सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात विविध विषयांवर बोलत असताना प्रभू श्री राम हे वनवासात असताना मांसाहार करत होते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून याबाबत जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिला होता. “आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे”, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

“देव धर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘राम मांसाहारी’ वक्तव्यावर रोहित पवारांची टीका

जितेंद्र आव्हाडांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

रोहित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं होतं. “रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्त्व देत नाही. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. अजून लहान आहेत ते. (आमदार म्हणून) पहिलीच टर्म आहे त्यांची”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे. “अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं आहे”, अशी खोचक टिप्पणीही आव्हाडांनी रोहित पवारांना उद्देशून केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction after ed action on ncp mla rohit pawar company baramati agro kvg