सावंतवाडी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्यालगत जमीन रविवारी अचानक खचली. यावरून कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता यंत्रणांनी याचे खापर चक्क निसर्गावर फोडले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने जमीन खचल्याचा दावा केला जात असला, तरी घटनेपूर्वी चार दिवसांत एकदाही जोरदार पाऊस झालेला नाही.

चबुतऱ्याच्या बाजूचा भराव खचून मोठे भगदाड पडल्याची बाब रविवारी उघड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक अभियंता शरद राजभोज यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत मालवणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ‘पेव्हर ब्लॉक’खालचा भराव वाहून गेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र घटना घडली, त्यापूर्वी चार दिवसांत मालवणमध्ये एकदाही १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊसच झाला नसल्याची नोंद शासकीय आकडेवारीमध्येच आहे. असे असताना आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी निसर्गावर खापर फोडणे कितपत योग्य आहे, असा सवाल शिवभक्त करीत आहेत. कामातील अनियमिततेसाठी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

आतापर्यंत काय घडले?

● राजकोट किल्ल्यावर नौदलाच्या वतीने ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

● मात्र त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत, २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळला.

● यामुळे तत्कालिन शिंदे सरकारची कोंडी झाली आणि तातडीने पुतळा उभारण्याची घोषणा सरकारने केली.

● फडणवीस सरकार आल्यानंतर १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नव्या पुतळ्याचा पायाभरणी केली आली.

● चौथऱ्यासहित ९३ फूट उंचीच्या नव्या पुतळ्याचे अवघ्या अडीच महिन्यांनी, ११ मे रोजी अनावरण करण्यात आले.

● १५ जून रोजी चौथऱ्याजवळची जमीन खचल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.