रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार कोसळलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला मोठा बसला होता. वेरवली – विलवडे स्टेशन दरम्यान मंगळवारी संध्याकाळी दरड कोसळून कोकण रेल्वेची वहातूक विस्कळीत झाली होती. मात्र तीन तासाच्या प्रयत्नाने दरड हटवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. रात्री उशिरा सर्व गाड्या मार्गस्थ करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

राज्याच्या हवामान खात्याने वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी दुपार पासून रत्नागिरी जिल्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यात संध्याकाळी पावसाचा जोर आणखीनच वाढला. याचा फटका कोकण रेल्वेला बसला. वेरवली ते विलवडे स्टेशन दरम्यान संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळली.

रुळावरच दरड कोसळल्याने कोकण रेल्वची वाहतूक तीन तासांसाठी ठप्प झाली होती. अनेक गाड्या कोकण रेल्वे मार्गावरील ठीक ठिकाणांच्या रेल्वे स्थानकांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. पाऊस मुसळधार सुरू असल्याने वाहतूक केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज येत नव्हता.

त्यानंतर रात्री उशिरा रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले. या दरम्यान रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे दरड हटविताना अडचणी येत होत्या. रात्री उशिरा दरड हटवण्यात येऊन तीन तासाने वाहतूक सुरू करण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यां दीड तास विलंबाने धावत असल्याचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.