ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. दरम्यान, आज हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील काही वेळापूर्वी म्हणाले होते की “मी आता मराठ्यांबरोबर दलित आणि मुस्लिम समाजांची मोट बांधणार आहे. त्यानंतर आणखी तीव्रतेने लढाई लढणार आहे”. जरांगे यांच्या या वक्तव्यावर लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं. हाके म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मुसलमानांची मतं चालली, परंतु इम्तियाज जलील चालले नाहीत. तुम्हाला दलितांची मतं चालली, परंतु तुम्ही आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना स्वीकारलं नाही. त्यामुळे दलित आणि मुस्लिमांची मोट बांधण्याच्या गप्पा तुम्ही मारू नका.
लक्ष्मण हाके म्हणाले, “मी ओबीसी, दलित मुस्लिम यांच्यासह सर्व अठरापगड जातींमधील लोकांना आवाहन करतो की तुम्ही या, आपण एकत्र बसून चर्चा करू. आपला कोण आणि परका कोण, या गोष्टीचा विचार करू. मराठे नेहमीच एकत्र राहिले आहेत. मराठ्यांनी नेहमी त्यांच्याच पाहुण्यांना निवडणुकांची तिकीटं दिली, कारखाने दिले, शिक्षणसंस्था दिल्या. मराठे कधीच वेगवेगळे नव्हते. ते नेहमी एकत्रच होते आणि आहेत. मराठे कधी कुठल्या चळवळीत नव्हते. त्यांनी कुठल्या चळवळीचं नेतृत्व केलं नाही. कारण मराठे हे नेहमी सत्तेत होते. ते कधीच सत्तेबाहेर राहिले नाहीत. मराठ्यांना निवडणुका जिंकण्याचा तंत्रज्ञान माहिती आहे आम्हा अठरापगड जातीची भावना, वेदना कधीच या सत्ताधाऱ्यांना समजली नाही.”
मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाकेंवर समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. यावर लक्ष्मण हाके म्हणाले, “आम्ही केवळ ओबीसींची भूमिका मांडत आहोत. आम्ही तेढ निर्माण केली नाही. आम्ही केवळ ओबीसींच्या मनात विश्वास निर्माण करतोय. ओबीसींच्या मनात विश्वास निर्माण झाला, ओबीसी एकत्र आले तर खूप बदल घडेल. मी आता मराठवाड्याच्या भूमीत आहे. मराठवाडा, विदर्भातील ओबीसींबद्दल सगळे बोलतात. परंतु, पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने ओबीसी राहतात. पश्चिम महाराष्ट्रातले ओबीसी एकत्र झाले. तर मनोज जरांगे… राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जाल.”
हे ही वाचा >> Maharashtra News Live : सह्याद्री अतिथीगृह येथे ओबीसी नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला सुरुवात
लक्ष्मण हाके म्हणाले, लोकशाहीत कोणीही धमक्या देऊ नये. आम्ही निश्चित सध्या एकत्र नाही. निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आम्हाला अवगत नाही. आम्हाला माहितीय की आम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. आमच्याकडे इतरांइतके पैसे नाहीत. परंतु, भविष्यात आम्ही आमच्या लाखमोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातून बदल घडवून आणू.
© IE Online Media Services (P) Ltd