२००६ मध्ये मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. यातल्या १२ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निकाल धक्कादायक असून महाराष्ट्र सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ट्रेनमधील २००६ च्या साखळी स्फोटातील १२ आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय सोमवारी दिला. यानंतर आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या आरोपींपैकी कमाल अन्सारीचा २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित आरोपींना सोडण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयाला आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. साखळी स्फोट घडवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा वापर केला गेला, याचीच माहिती तपास यंत्रणेने सादर केली नसल्याचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने निकालात अधोरेखित केले. तसेच, स्फोटके, नकाशे आणि बंदुका हे पुरावे आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. त्यानंतर या आरोपींची मुक्तता करण्यात आली. दरम्यान या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

विशेष न्यायालयाने या प्रकरणी १३ आरोपींवर खटला चालवला होता. त्यात कमाल अन्सारी (आता मृत), मोहम्मद फैझल अत्तार रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी, नाविद हुसेन खान आणि आसिफ खान यांना विशेष न्यायालयाने बॉम्ब ठेवल्याच्या मुख्य आरोपांसह अन्य आरोपांत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. तर, तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, मोहम्मद माजिद मोहम्मद शफी, शेख मोहम्मद अली आलम शेख, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीउर रहमान शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वाहिद शेख याला न्यायालयाने निर्दोष ठरवले होते. गेल्या १९ वर्षांपासून कैदेत असलेल्या सर्व आरोपींची जामिनावर तातडीने सुटका करण्याचे आदेश न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठाने दिले.